३० सप्टेंबरपर्यंत जलशक्ती अभियान

B1न्यूज मराठी नेटवर्क
वाशिम : भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत साठवणुकीसाठी केंद्र सरकार राज्य शासनाच्या मदतीने राबवीत असलेले जलशक्ती अभियान महत्वपूर्ण ठरले आहे. मागील तीन वर्षात या अभियानांतर्गत झालेली कामगिरी पाहता या अभियानाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी हे अभियान 30 सप्टेंबर 2023 पर्यंत राबविण्यात येणार आहे.
जनशक्ती अभियानांतर्गत माती आणि पाण्याचे संधारण करून त्याचा उपयोग मानव पर्यावरण व परिसंस्था यांचे संतुलन अबाध्य ठेवून उत्पादकता, उत्पन्न आणि निव्वळ नफा वाढवून ज्यामुळे सामाजिक स्तर उंचावला जाऊन मानव कल्याण साध्य होण्यास मदत होईल. त्यासाठी पाण्याच्या वापराचे व्यवस्थापन, मातीचे व्यवस्थापन, पाणी आणि योग्य कस असलेली माती यांच्या उपलब्धतेचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. हे अभियान जलसंधारण आणि पावसाचे पाणी साठवण, पारंपारिक आणि इतर जल स्त्रोत,तसेच मुख्य जलसाठयांचे नूतनीकरण, जल संरचनेचा पुनर्वापर आणि पुनर्भरण, पाणलोट क्षेत्र विकास करणे आणि सघन वनीकरण या पाच उपक्रमांवर आधारित आहे.