निश्चित कालमर्यादेत प्रलंबित प्रधानमंत्री पीक विमा अदा करावा : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

जिल्हास्तरीय संयुक्त समिती, तक्रार निवारण समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून सूचना
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : खरीप हंगाम २०२० तसेच २०२१, २०२२ मधील प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधील प्रलंबित प्रकरणी कालमर्यादा निश्चित करून शेतकऱ्यांना पीक विमा अदा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.
प्रधानमंत्री पीक विमा योजना व पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात जिल्हास्तरीय संयुक्त समिती व जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, तंत्र अधिकारी व्ही. बी. दारकुंडे, कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. लालासाहेब तांबडे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पी. एस. नाशिककर, दूरदृष्य प्रणाली द्वारे आय सी आय सी आय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीचे राज्यस्तरीय विभागीय व्यवस्थापक, भारतीय कृषि विमा कंपनी आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीचे राज्यस्तरीय व्यवस्थापक व जिल्हा प्रतिनिधी, शेतकरी संघटनेचे शंकर गायकवाड व शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत कंपनीने कालमर्यादा निश्चित करून त्यानुसार शेतकऱ्यांना प्रलंबित पीकविमा नुकसान भरपाई वेळेत अदा होईल, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देऊन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, नैसर्गिक आपत्ती अंतर्गत रब्बी २०२२ – २३ मध्ये प्राप्त झालेल्या पीक नुकसानीच्या पूर्वसूचना सरसकट नामंजूर न करता प्रत्यक्ष शेतामध्ये सर्वेक्षण करून त्या आधारे योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. तसेच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कंपनीकडे पाठवण्यात आलेल्या तक्रारींचे वेळेत निराकरण केले जावे व तसा अहवाल सादर करण्याबाबत निर्देश दिले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार २०२२ – २३ मध्ये जिल्ह्यात बोगस फळपीक विमा सहभागाची प्रकरणे निदर्शनास आलेली असून, प्रत्यक्ष सर्वेक्षणअंती २ हजार १५७ हेक्टरवर फळबागा नसताना फळपीक विमा योजनेत बोगस सहभाग असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकरणी विमा कंपनीने शासन निर्णयातील तरतुदींच्या आधारे तात्काळ कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.