जलजीवन मिशन अंतर्गत दर्जेदार कामे करा पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर, दि. ५ ( जि. मा. का.) – सोलापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन च्या कामासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या कामांचा दर्जा चांगला राहील, याची दक्षता घ्या, अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत कामांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, संजय मामा शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त शीतल तेली – उगले, जिल्हा परिषद प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील माळी, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड आदि उपस्थित होते.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन योजनेची चांगली अंमलबजावणी होणे अपेक्षित आहे. कामांच्या दर्जाबाबत तक्रारी आहेत. या पार्श्वभूमिवर स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन दर्जेदार कामे करावीत. पुढील बैठकीत याचा आढावा घेतला जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. आमदार सुभाष देशमुख,आमदार संजयमामा शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार समाधान आवताडे यांनी मते मांडली.
गुणवत्तापूर्ण जलवाहिनीची खरेदी, ज्या ठेकेदारांनी दोनपेक्षा अधिक कामे अपूर्ण ठेवली आहेत, त्यांना पुढील निविदा प्रक्रियेत अपात्र करा. पात्र ठेकेदारांची यादी तयार करा. काळ्या यादीत टाकलेले ठेकेदार यांची देखील माहिती सादर करा, अशा सूचना यावेळी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या.

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी जलजीवन मिशनच्या कामांची माहिती दिली. ८६२ गावांसाठी ८५५ योजना आहेत. कामाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करण्यात येत आहे. कामाच्या गुणवत्तेत तडजोड केली जाणार नाही. चांगली कामे करून घेण्यात येतील, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड यांनी जलजीवन मिशनच्या कामात दर्जा ठेवण्यासाठी संनियंत्रण करण्यात येत आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करण्यात येत आहे. ज्या ठेकेदारांनी दोनपेक्षा अधिक कामे प्रलंबित ठेवली आहेत, त्यांची यादी तयार करण्यात येत आहे. ठेकेदारांची क्षमता तपासण्यात येत असल्याचे सांगितले. अधीक्षक अभियंता सुनील माळी यांनी चौकशी अहवालातील बाबी पालकमंत्री यांच्यासमोर सादर केल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या