आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी प्रक्रिया सुरू : ऑनलाईन अर्जांसाठी अंतिम मुदत 17 मार्च
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (Right To Education Act) खासगी प्राथमिक शाळांमधील 25 टक्के जागांवर आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांना पहिली ते आठवीपर्यंत मोफत शिक्षणाची संधी उपलब्ध करुन दिली जाते. आरटीई ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. ऑनलाईन अर्जांसाठी अंतिम मुदत 17 मार्च आहे. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 827 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. आरटीई प्रवेशांसाठीची शाळा नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर विद्यार्थी नोंदणी कधी सुरु होणार याकडे पालकांचे लक्ष लागले होते. प्रवेशासाठी मुलाचे आधार कार्ड स्वीकारण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात आल्यानंतर विद्यार्थी नोंदणी सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पालकांना 1 ते 17 मार्च या कालावधीत अर्ज करता येईल.
ऑनलाईन अर्ज कुठे करणार?
यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 827 शाळांमध्ये 1 लाख 1 हजार 926 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. ऑनलाईन अर्ज आणि प्रवेश प्रक्रिया, कागदपत्रांबाबतची माहिती https://student.maharashtra.gov.in/ संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
…तर अर्ज बाद होणार
प्रवेश प्रक्रियेसाठी लॉटरीसाठी अर्ज विचारात घेतला जावा यासाठी अनेक पालक एकापेक्षा अधिक अर्ज भारतात. मात्र, यंदापासून एकहून अधिक अर्ज भरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याचे एकापेक्षा अधिक अर्ज भरले असल्याचे निदर्शनास आल्यास त्याचा अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही, हे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
लॉटरी कधी निघणार?
ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ऑनलाईन लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. 25 टक्के आरक्षणातंर्गत जागांसाठी एकाच टप्प्यात लॉटरी काढण्यात येणार आहे. शाळेतील जागांनुसार प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल. लॉटरीमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाणार असल्याचेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना कागदपत्रे घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
आरटीईसाठी अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे :
आरटीईसाठी अर्ज निवासी पुराव्यात ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, घरपट्टी, मतदान ओळखपत्र, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक यातील एका पुरावा ग्राह्य धरता येण्यार आहे. या शिवाय जन्मतारखेचा पुरावा, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय पुरावा, आर्थिक दृष्ट्या दुर्बल संवर्गातून येत असल्याचा वार्षिक उत्पन्नाचा पुरावा, अनाथ बालकांची आवश्यक प्रमाणपत्रे, विधवा/ घटस्फोटीत महिला असल्याचा पुरावा अशी विविध कागदपत्रे ही प्रवेशाच्या वेळी पालकांना सादर करावी लागणार आहेत.