पावसाच्या खंडामुळे वाळत चाललेल्या पिकांची व फळबागांची खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केली पाहणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे अनेक भागांतील सोयाबीनसह विविध खरीप पिके तसेच फळबागा पाण्याअभावी वाळत चालल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असून बळीराजा गंभीर संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आज बार्शी तालुक्यातील पांगरी व घारी परिसरातील शेतांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांची प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी त्यांनी पिकांची सद्यस्थिती व नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, समस्या आणि व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याचे पाहणीदरम्यान निदर्शनास आले. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून वस्तुनिष्ठ नोंद करावी आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच आवश्यक ती शासकीय मदत उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना खासदार राजेनिंबाळकर यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या. शेतकऱ्यांच्या नुकसानीची गांभीर्याने दखल घेऊन पंचनाम्याची कार्यवाही जलदगतीने पूर्ण करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळीसांगितले.
तसेच शेतकऱ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. “संकटाच्या या काळात बळीराजाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी प्रशासन व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांना योग्य तो न्याय आणि आवश्यक ती शासकीय मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील,” असे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी पांडुरंग गपाट, नगरसेवक अजय भानवसे, नगरसेवक मुजम्मील पठाण, नगरसेवक शंकर देवकर, नगरसेवक आर्यन पाचपोते, नगरसेवक प्रशांत जाधव, नगरसेवक बप्पा कसबे, नगरसेवक अनिकेत कारंडे, नगरसेवक मेहंदी लांडगे, नगरसेवक भैरवनाथ शिंदे यांच्यासह तहसीलदार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी (BDO), तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




