पीक नुकसान भरपाईसाठी आयुक्तकार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या,भरपाईची रक्कम लवकरच शेतकऱ्यांचे खात्यात जमा न झाल्यास तीव्र आंदोलन… शंकर गायकवाड

पिक विम्याचे राज्यप्रमुख विनयकुमार आवटे यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड व विविध जिल्ह्यातील शेतकरी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : संपूर्ण राज्यभर मागील काही दिवसापासून अतिवृष्टी व संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यभर आंदोलने करून राज्य सरकारला संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांना संततधार व अतिवृष्टीची नुकसान भरपाई मंजूर करण्यास भाग पाडले परंतु अजूनही राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या खात्यावर ही भरपाई व पिक विम्याची अग्रीम रक्कम अजूनही जमा करण्यात आलेली नसल्यामुळे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले.
त्यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सतीश मोरे, उस्मानाबादचे आनंद करळे, इंदापूर तालुका अध्यक्ष गुलाब फलफले, संतोष खुरंगे, सोलापूरचे सचिन आगलावे, सौदागर डांगरे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
कृषी आयुक्त उपस्थित नसल्यामुळे पीक विम्याचे राज्यप्रमुख विनयकुमार आवटे यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारून मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल असे आश्वासन यावेळी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी गायकवाड यांनी मागण्यांची पूर्तता लवकरच न झाल्यास पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.