आषाढी वारीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज; 342 अधिकारी, 3,528 पोलीस अंमलदार तैनात
B1न्यूज मराठी नेटवर्क
पंढरपूर, दि. 21 : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पंढरपूरमध्ये पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. वारी निर्विघ्न आणि सुरक्षित पार पडण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.
वारी काळात सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेसाठी 342 अधिकारी, 3,528 पोलीस अंमलदार आणि 3,110 होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये एक पोलीस अधीक्षक, चार अप्पर पोलीस अधीक्षक, 22 उपअधीक्षक, 53 पोलीस निरीक्षक, 263 सहाय्यक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांचा समावेश आहे. याशिवाय 7 एसआरपीएफ कंपन्या, 10 बॉम्ब शोधक व नाशक (BDS) पथके, एक आरसीपी पथक, तीन क्यूआरटी पथके आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी 16 प्रशिक्षित CART पथके तैनात करण्यात आली आहेत.
चंद्रभागा नदी परिसरातील सुरक्षेसाठी 10 ठिकाणी होडी नियंत्रक पथके कार्यरत करण्यात आली असून, नदीपात्र, 65 एकर परिसर, महाद्वार, महाद्वार घाट, पत्राशेड आदी ठिकाणी 46 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. तसेच 352 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे संपूर्ण परिसरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे.
भाविकांच्या मदतीसाठी 13 तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरू करण्यात आली असून, सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट, अंबाबाई पटांगण आदी ठिकाणी ही केंद्रे कार्यरत असतील. चोरी व अन्य अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘माऊली स्कॉड’ स्थापन करण्यात आले असून, त्यामध्ये साध्या वेशातील पोलीस अधिकारी तैनात राहणार आहेत.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार जड वाहतूक शहराबाहेरून वळविण्यात आली आहे. यासाठी 13 डायव्हर्जन पॉइंट सुरू करण्यात आले असून, शहरात आणि शहराबाहेर 17 वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. वारी सुरक्षित, सुव्यवस्थित आणि शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी वारकरी भाविकांना केले आहे.





