सुरक्षित आषाढी वारीसाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई; ७०४ सराईत गुन्हेगारांकडून लिहून घेतले हमीपत्र
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : येत्या १९ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी वारी सोहळ्यासाठी लाखो वारकरी सोलापुरात दाखल होत आहेत. वारकऱ्यांची सुरक्षितता आणि जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील ७०४ सराईत गुन्हेगारांना पोलीस मुख्यालयात पाचारण करून, आषाढी वारीच्या कालावधीत शांतता राखण्याचे हमीपत्र लिहून घेतले आहे.
अनोखी शक्कल: गुन्हेगारांचे समुपदेशन
यात्रा कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्हयातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर नजर ठेवली आहे. यामध्ये दोन किंवा अधिक गुन्हे दाखल असलेले आरोपी, क्रिमिनल गुंड, अवैध दारू विक्रेते आणि जुगार अड्डे चालवणाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांना पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर बोलावून, त्यांना वारीच्या काळात कायदा हातात न घेण्याबाबत सक्त ताकीद देण्यात आली.
सुधारण्याची संधी आणि आवाहन
केवळ कारवाई न करता, पोलिसांनी या गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात येण्याची संधीही दिली आहे. बेरोजगार असलेल्या गुन्हेगारांना सुधारण्यासाठी त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहे. गुन्हेगारी सोडून सन्मानाने जगण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
७०४ गुन्हेगारांवर कारवाई
भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (भा.ना.सु.सं.) कलम १२६ व १२९ नुसार, सार्वजनिक शांतता राखण्यासाठी या ७०४ गुन्हेगारांकडून प्रत्येकी २५,००० रुपयांचे बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे. यामध्ये विविध गुन्ह्यांतील ९० सराईत गुन्हेगार, महिलांसंबंधी गुन्हे असलेले ४०९, २७ हिस्ट्रीशीटर्स, ४१ क्रिमिनल गुंड, ३५ रिपीट ऑफेंडर्स, ६६ अवैध दारू विक्रेते आणि ३६ जुगार चालकांचा समावेश आहे.
ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी करण्यात आली. या मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अंमलदारांनी विशेष परिश्रम घेतले.





