बार्शीतील विस्कळीत पाणी पुरवठ्यावर तातडीने उपाययोजना करा; विरोधी पक्षाची मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरात अनेक भागांत अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शहरातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते तसेच नगरसेवकांनी केला. विस्कळीत जलपुरवठ्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून पाणी वितरणाचे अचूक नियोजन करावे, नियमित व सुरळीत पाणीपुरवठा सुनिश्चित करावा तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी विरोधी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील पाणीप्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अन्यथा पुढील काळात आंदोलनाचा इशाराही दिला आहे.




