कला – क्रीडा व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम – प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ
समाज कल्याण विभागाच्या इंद्रधनुष्य कला व क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ
B1न्यूज मराठी नेटवर्क
अहिल्यानगर, दि.१३ : कला व क्रीडा हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असून त्यातून आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होतात, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे नाशिक प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ यांनी केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित विभागीय ‘इंद्रधनुष्य’ कला व क्रीडा महोत्सवाच्या शुभारंभप्रसंगी वाघ बोलत होते.
यावेळी नाशिकचे सहायक आयुक्त देविदास नांदगावकर, जळगाव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त राकेश पाटील, जळगावचे सहायक आयुक्त योगेश पाटील, नंदुरबारचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी नंदकुमार सूर्यवंशी, अहिल्यानगरचे प्रवीण कोरगंटीवार, जिल्हा समाजकल्याण अधिकारी देविदास कोकाटे, संशोधन अधिकारी अनिल तिदमे, सहायक लेखाधिकारी संदीप देठे, विशेषाधिकारी सावित्रा लबडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वाघ म्हणाले, स्पर्धा ही केवळ जिंकण्यासाठी नसून स्वतःची क्षमता ओळखण्यासाठी व क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी असते. सातत्य, मेहनत व जिद्दीच्या बळावर यश मिळविणे शक्य असल्याचे सांगत, अशा प्रकारच्या क्रीडा महोत्सवातून जीवनाला एक नवी दिशा मिळते, असेही त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात सहायक आयुक्त कोरगंटीवार यांनी क्रीडा स्पर्धा आयोजनामागची भूमिका विशद केली.
यावेळी समाजकल्याण विभागाच्या आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन निरीक्षक संगीता चितळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसन्ना धुमाळ यांनी केले.
सर्वप्रथम सर्व खेळाडूंनी पथसंचलनाद्वारे मान्यवरांना मानवंदना दिली. या महोत्सवात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी केली. नाशिक व अहिल्यानगर संघात झालेल्या रस्सीखेच स्पर्धेने या क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.





