डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात रोजगार मेळावा , रोजगार देणारे व्हा – कुलगुरु डॉ. फुलारी

0

कौशल्य आत्मसात करा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि.११ : विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. तसे केल्यास रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले. विद्यार्थ्यांनी आपल्या रोजगाराची संधी शोधतांना एक दिवस आपण स्वतः रोजगार देणारे व्हावे,असे आवाहन कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांनी आज केले.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आज पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरु डॉ. विजय फुलारी या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. मेळाव्यास पदविका, पदवी व पदव्यूत्तर पदवीधारक उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सेंट्रल ट्रेनिंग व प्लेसमेंट सेल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सी. आय. आय. तसेच मॅनयुनायटेड यांच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजीत करण्यात आला.

प्र-कुलगुरु डॉ.वाल्मिक सरवदे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार उपायुक्त विद्या शितोळे, सहाय्यक आयुक्त राजु वाकुडे, रोजगार व उद्योजकता अधिकारी सुरेश बहुरे, मॅन युनाटेड कॉर्पोरेटचे रवींद्र कांगराळकर, प्लेसमेंट ऑफीसर डॉ.गिरीश काळे यावेळी उपस्थित होते. डॉ.गिरीष काळे यांनी सूत्रसंचालन तर डॉ.संजय शिंदे यांनी आभार मानले.

४५ कंपन्यांचा सहभाग छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील नामांकित कंपन्या या मेळाव्यात सहभागी झाल्या. टोयोटा किर्लोसकर मोटर, अथर एनर्जी, पर्किन्स इंडिया, ऋचा इंजिनिअर्स, मेडी-रिक्रूटर, कल्याण ज्वेलर्स, कॉस्मो फिल्म्स, क्लॅड मेटल इंडिया , बागला गृप ऑफ इंडस्ट्रीस, एस एस कंट्रोल, मेटलमॅन ऑटो, एल. आय. सी., इंस्टर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एक्सीडी इंडिया लि., शॉपर्स स्टॉप प्रा. ली. (प्रोझोन), ज्ञानदीप फाउंडेशन सेंटर, एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी प्रा. ली., के आर बेदमुथा टेक्नो असोसिएटस या प्रख्यात ४५ कंपन्या त्यांच्या आस्थापनेवरील दीड हजार रोजगार संधी सहित सहभागी झाल्या. बुधवारी सकाळी ९ वाजेपासून नाव नोंदणी सुरु करण्यात आली. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मुलाखती घेण्यात येत आहेत.

कौशल्य आत्मसात करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

शासकीय नोकऱ्यांपेक्षाही खासगी कंपन्यामध्ये नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यातही कौशल्य आत्मसात करुन त्या आधारीत पदविका, पदवीधारकांनी आपल्या क्षमतेचा वापर करुन रोजगार मिळवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले. तसेच राज्य व केंद्र शासनाच्या वतीने रोजगार, स्वयंरोजगार संदर्भात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.

कंपनीचा मालक होण्याचे स्वप्न बाळगा-कुलगुरु डॉ. फुलारी

आपण ज्या कंपनीत नोकरी मागतो आहोत, तशीच स्वतःची कंपनी स्थापन करुन लोकांना रोजगार देण्याचे स्वप्न बाळगा, असे आवाहन कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी केले. मोबाईच्या स्क्रिनवर गरजेपेक्षा जास्त वेळ दवडू नका, असेही ते म्हणाले.
त्यानंतर सकाळी ११ वाजता प्रत्यक्ष मुलाखतींना सुरुवात झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या