कासारवाडीत एनएसएस शिबिरात ‘जल, जंगल आणि जमीन संवर्धन’वर प्रेरणादायी व्याख्यान : छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा दाखला देत आनंद कसबे यांचे प्रभावी मार्गदर्शन
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत मौजे कासारवाडी येथे आयोजित सात दिवसीय विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ‘जल, जंगल आणि जमीन यांचे संवर्धन ही काळाची गरज’ या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान संपन्न झाले.
हे शिबिर ‘शाश्वत विकासाच्या दिशेने युवकांची भूमिका : जलसंधारण व्यवस्थापन व पडीक जमीन विकास’ या महत्त्वपूर्ण विषयावर दि. १७ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी प्रमुख व्याख्याते म्हणून आनंद कसबे (मुख्याध्यापक, संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पानगाव) यांनी स्वयंसेवकांना मौलिक मार्गदर्शन केले.
आपल्या प्रभावी भाषणात आनंद कसबे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे उदाहरण देत सांगितले की, आरमार उभारणीसाठी सुद्धा त्यांनी पर्यावरणाचा समतोल बिघडू दिला नाही. आपल्या परिसरातील आंब्याची झाडे तोडू नयेत, जंगलसंपत्तीचे जतन व्हावे आणि जमिनीचा सुयोग्य वापर व्हावा, यासाठी त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध धोरण अवलंबले होते. आजच्या पिढीनेही त्याच विचारांची प्रेरणा घेऊन पाणी, झाडे व जमीन यांचे संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून भावी पिढ्यांसाठीची जबाबदारी असल्याची भावना त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. साक्षी धुमाळ हिने केले. तिने जल, जंगल व जमीन यांच्या संवर्धनाचे महत्त्व विशद करत शिबिरामागील भूमिका मांडली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय यश कोळी याने करून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगणक विभाग प्रमुख प्रा. बी. व्ही. लिंगे हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी, “विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून गावात जाऊन लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवावा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश कृतीतून पोहोचवावा,” असे आवाहन केले.
या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमास कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे, प्रा. के. एम. माळी, प्रा. एस. एम. भांबीरे, प्राध्यापिका एम. पी. शिंदे तसेच सुमारे १०० स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. लक्ष्मी शर्मा हिने अत्यंत संयोजित व प्रभावी पद्धतीने केले तर आभार कु. अमृता राऊत हिने मानले.
या व्याख्यानामुळे स्वयंसेवकांमध्ये पर्यावरण संवर्धनाविषयी नवचैतन्य निर्माण झाले असून, प्रत्यक्ष कृतीतून गावाच्या विकासासाठी योगदान देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.





