ग्रामीण रस्त्यांच्या सीमांकनासाठी तहसील कार्यालयाचा कृती आराखडा जाहीर
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : ग्रामीण भागातील रस्ते, गाडीमार्ग, पायवाटा आणि शेतपांद रस्त्यांचे सीमांकन करून त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यासाठी बार्शी तहसील कार्यालयाने तालुकास्तरीय कृती आराखडा जाहीर केला आहे. तहसीलदार एफ.आर. शेख यांनी 9 सप्टेंबर 2025 रोजी यासंदर्भातील आदेश जारी केले असून, 10 ते 22 सप्टेंबर या कालावधीत टप्प्याटप्प्याने कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व गावांमधील रस्त्यांचे सर्वेक्षण, सीमांकन आणि अतिक्रमण हटवणे बंधनकारक आहे. यासाठी ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी, पोलीस पाटील आणि महसूल सेवकांच्या मदतीने गावनकाशावर असलेले तसेच नसलेले रस्ते शोधून प्राथमिक यादी तयार केली जाणार आहे. ही यादी ग्रामसभेत मांडून ठराव पारित केल्यानंतर तहसील कार्यालयाकडे सादर केली जाईल. पुढे भूमी अभिलेख विभागाकडून मोजमाप व जिओ-रेफरन्सिंगसह सीमांकन केले जाईल.
प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अतिक्रमण आढळल्यास नोटिसा बजावून सुनावणी घेण्यात येईल आणि त्यानंतर अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जाईल. अद्ययावत नोंदी गाव नमुना क्रमांक 1फ मध्ये समाविष्ट केल्या जातील आणि रस्त्यांना विशिष्ट क्रमांक देऊन गाव दप्तरात नोंदी केली जाणार आहेत.
ही कार्यवाही बार्शी, सौंदरे, खांडवी, वैराग, पांगरी, उपळे दुमाला, गौडगाव, पानगाव, नारी, आगळगाव आणि सुडी या मंडळांमध्ये केली जाणार असून, प्रत्येक मंडळात जबाबदारी ग्रामसेवक व महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी आवश्यकतेनुसार पोलीस मदतही घेण्यात येणार आहे.
तहसीलदारांनी सर्व कामे निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश दिले असून, विलंब झाल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार आहे. प्रत्येक टप्प्याचा प्रगती अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांच्या नोंदी व्यवस्थित होऊन अतिक्रमणमुक्त रस्ते उपलब्ध होतील. शेतकऱ्यांना शेतापर्यंत पोहोचणे सुलभ होईल आणि दळणवळणाची सुविधा सुधारेल, असा विश्वास तहसील कार्यालयाने व्यक्त केला आहे.




