डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला सर्वधर्मसमभावाचा विचार देशाला तारणारा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा समतेचा संग्राम ठरला
B1न्यूज मराठी नेटवर्क
नाशिक : महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेला काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह हा समतेच्या न्यायाच्या मानवतेच्या हक्काचा संग्राम ठरला आहे.मानवमुक्तीचा संग्राम ठरला. जगभर मानवी हक्काचा लढ्यातील समतेचा संगर म्हणून काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह लढ्याचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी आज नाशिक येथे केले.
काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या 95 व्या वर्धापन दिनी काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथे काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या कीर्तिमान शिलालेख येथील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास ना .रामदास आठवले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बौद्ध भंते आणि सर्व बौद्ध उपासकांनी सामूहिक बुद्ध वंदना घेतली.
यावेळी काळाराम मंदिराचे म्हणत सुधीर दास यांनी ना. रामदास आठवले यांचे स्वागत करून मंदिरात प्रवेशाची विनंती केली. यावेळी ना.रामदास आठवले; त्यांचे सर्व कुटुंबीय ; सर्व बौद्ध उपासक; भदंत सुगत महाथेरो; भदंत राहुल बोधी महाथेरो रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे आदी अनेक मान्यवरांनी काळाराम मंदिरात प्रवेश केला.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेला सर्वधर्मसमभावाचा विचार देशाला तारणार आहे. आम्ही आता बौद्ध आहोत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मंदिर प्रवेशाचा नाही तर शाळा प्रवेशाचा संदेश दिला आहे. आम्हाला आज काळाराम मंदिरात प्रवेशा साठी आमच्या स्वागतासाठी मंदिराचे महंत आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. आम्ही सर्व धर्म सम भाव हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार जोपासत आहोत. त्यामुळे आज आम्ही काळाराम मंदिरात प्रवेश केला असल्याचे ना.रामदास आठवले म्हणाले.