खून करून पुरलेल्या प्रेताचा आणि आरोपीचा बार्शी तालुका पोलिसांनी लावला छडा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या दक्षतेमुळे एका गुन्ह्याचा अवघ्या काही दिवसांत छडा लावण्यात यश आले आहे. बार्शी तालुक्यातील बाभुळगाव येथे खून करून पुरलेले प्रेत आढळल्यानंतर पोलिसांनी जलदगतीने तपास करून आरोपींना अटक केली आहे.
इसम सुरेश रंगनाथ शिंदे (वय ६८, रा. बाभुळगाव, ता. बार्शी, जि. सोलापूर) हे दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ४ वाजता बार्शीहून बाभुळगावला जाण्यासाठी निघाले होते. मात्र, ते घरी न पोहोचल्याने त्यांच्या मुलगा गोविंदा सुरेश शिंदे यांनी नातेवाईक व मित्रांकडे चौकशी केली. कोणतीही माहिती न मिळाल्याने २० फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजता शेतकरी नितीन रमेश शिंदे यांच्या शेत गट क्रमांक १६५ मध्ये ऊस लागवडीसाठी जमीन खोदताना एक मानवी पाय जमिनीत अर्धवट गाडलेला आढळून आला.
याबाबतची माहिती मिळताच पोलिस व महसूल अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचासमक्ष प्रेत उकरले असता, ते सुरेश रंगनाथ शिंदे यांचे असल्याचे त्यांच्या मुलाने ओळखले. प्रेताच्या दोन्ही हात शर्टाने बांधलेले होते व गळ्यावर आवळल्याच्या खुणा दिसून आल्या.
या घटनेनंतर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५५/२५ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ (खून) आणि २०१ (पुरावा नष्ट करणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान वेगवेगळ्या पथकांनी परिसरात सखोल चौकशी केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दिलीप निवृत्ती झोंबाडे आणि बाभुळगाव येथील सालगडी राहूल नागेश गायकवाड (रा. कडलास, ता. सांगोला) यांना ताब्यात घेतले.
प्राथमिक चौकशीदरम्यान आरोपींनी सुरेश रंगनाथ शिंदे यांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि रोख पैशांसाठी कट रचून त्यांचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली. गुन्हा लपवण्यासाठी त्यांनी प्रेत नितीन शिंदे यांच्या शेतात पुरल्याचेही उघड झाले. तांत्रिक तपासाद्वारे देखील या दोघांचा सहभाग निष्पन्न झाला.
सदर आरोपींना अटक करून त्यांना बार्शी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता सोनवणे यांनी बाजू मांडली. तपासादरम्यान आणखी आरोपी सहभागी असल्याची शक्यता असून, पुढील चौकशी सुरू आहे.
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस हवालदार राजेंद्र मंगरुळे, अभय उंदरे, धनराज केकाण, सागर शेंडगे, राहूल बोंदर, सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, एएसआय अजित वरपे, हवालदार धनराज फत्तेपूरे, रतन जाधव आणि सायबर पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांचाही तपासात मोलाचा वाटा होता.
बार्शी तालुका पोलिस ठाण्याच्या या जलद आणि काटेकोर तपास कार्यामुळे गुन्हेगारांना गजाआड करण्यात मोठे यश आले आहे. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर आणि उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांनी संपूर्ण तपास पथकाचे विशेष कौतुक केले आहे.
बार्शी तालुका पोलिसांची ही तत्परता आणि निष्पक्ष कारवाई कौतुकास्पद असून, त्यांनी पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडली आहे.