बार्शी पोलिसांची जलद आणि उल्लेखनीय कामगिरी: बनावट सोने विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहर पोलिसांनी बनावट सोने विकून फसवणूक करणाऱ्या राजस्थानातील टोळीला गजाआड करत व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे. पोलिसांच्या तात्काळ कृतीने आणि प्रभावी तपासामुळे अवघ्या काही दिवसांत आरोपींना अटक करण्यात आली, ज्यामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
बार्शीतील व्यापारी स्वप्निल हिरालाल जैन यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ७ जानेवारी रोजी एका पुरुष व महिलेने “पत्नी आजारी आहे” असे सांगत त्यांच्या वडिलांकडून एक मणी विकला. काही दिवसांनी पुन्हा तेच दोघे परत आले आणि दोन मणी विकले. या व्यवहारानंतर जैन यांनी १० लाख रुपयांच्या बदल्यात २ किलो सोन्याच्या मण्यांची माळ विकत घेतली. मात्र, ती माळ बनावट असल्याचे समोर आले. या प्रकारानंतर त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बार्शी पोलिसांनी त्वरित तपास सुरू केला आणि गुप्त माहितीच्या आधारे बारामती एसटी स्टँड परिसरातून तीन आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे , श्रवणकुमार जेठाराम राठोड (वय ४०)नंदुकुमार धन्नाराम बाघरी (वय ३७)श्रवणकुमार विराराम वाघरी (वय ३१) तीघेही राजस्थानमधील जालोर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी बनावट सोन्याच्या मण्यांच्या सहाय्याने फसवणूक केल्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईचे श्रेय बार्शी पोलिसांच्या चोख नियोजन आणि तात्काळ निर्णयक्षमता यांना जाते. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने उल्लेखनीय कार्य केले आहे.
तपास पथकात सहायक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, बाळासाहेब जाधव, पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर, तसेच हवालदार अजित वरपे, श्रीमंत खराडे, बाळकृष्ण दबडे, महिला पोलीस शारदा सानप आणि सायबर शाखेतील कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या जलद कारवाईमुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. फसवणूक झालेल्या फिर्यादी स्वप्निल जैन यांनी पोलिसांचे आभार मानत, “आम्हाला वेळेत न्याय मिळाला,” असे सांगितले.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करत असून आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. बार्शी पोलिसांनी दाखवलेली जलद कार्यक्षमतेची ही घटना पोलिसांवरील विश्वास अधिक वाढवणारी ठरली असून त्यांच्या कार्यक्षमतेला सर्व स्तरांतून सलाम केला जात आहे.