बार्शी तालुक्यातील ९० हजार शेतकऱ्यांना हेक्टरी ३० हजार रुपये पिक विमा मिळावा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील शेतकऱ्यांना सन २०२४ वर्षातील खरीप पिकासाठी ३० हजार रुपये हेक्टरी पीक विमा मिळावा. पिकाच्या नुकसानी प्रमाणे पीक विमा दिला नाही तर विमा कंपनीला जबाबदार धरून जिल्हा कृषी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांना निवेदन देत दिला.
तालुक्यात गेल्या वर्षीच्या तुलनेने चालू वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. सन २०२४ मधील खरीप हंगामात अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने सोयाबीन या पिकाचे खूप मोठे नुकसान झाले होते. ओढावलेल्या नैसर्गिक आपत्ती दरम्यान विमा कंपनीच्या निकषानुसार झालेल्या नुकसानीच्या पूर्व सूचना तालुक्यातील ९० हजार शेतकऱ्यांनी नोंदवल्या होत्या. सोयाबीन पिकाचे नुकसान होऊन चार ते पाच महिने झाले, तरी अद्याप शेतकऱ्यांना पिक विमा जमा झालेला नाही.
जर पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाला नाही तर जिल्हा कृषी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा राहुल भड, अशोक माळी, भरत वाघमोडे, शिवाजी वाघमोडे आदी शेतकऱ्यांनी निवेदनामध्ये दिला आहे.