आर्थिक सक्षमीकरणामुळे महिलांची प्रगती – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

छत्रपती संभाजीनगर, दि.१६: बचत गटाच्या महिला मोठ्या कष्ट आणि जिद्दीने सर्व अडचणींवर मात करुन यश मिळवित आहेत. त्यातून त्यांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. आता या महिलांनी संक्रांतीच्या पर्वावर आत्मविश्वास आणि प्रोत्साहनाचे वाण वाटावे आणि आपल्या इतर भगिनींचीही प्रगती साधावी. महिलांची प्रगती ही पर्यायाने समाजाची आणि देशाची प्रगती होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.

राज्यस्तरीय मिनी सरस २०२५ या महिला बचत गटांनी उत्पादीत वस्तू व मालाचे प्रदर्शन जिल्हा परिषद मैदानावर सुरु असून या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अशोक सिरसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, सहायक प्रकल्प संचालक उल्हास खळेगावकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक विक्रम सरगर, व्यवस्थापक विपणन सचिन सोनवणे, जिल्हा व्यवस्थापक विभीषण भोईटे, जिल्हा व्यवस्थापक सुचिता खोतकर, जिल्हा व्यवस्थापक प्रज्ञा दाभाडे, सतिष औरंगाबादकर आदी उपस्थित होते.

प्रकल्प संचालक अशोक सिरसे यांनी प्रास्ताविकात माहिती दिली की, या प्रदर्शनात १२ जिल्हे सहभागी झालेले असून ९३ स्टॉल्स आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियान , महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय शहरी विकास अभियान, आत्मा अशा विविध संस्थांमार्फत आलेले बचत गट यात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानअंतर्गत जिल्ह्यात एकूण १८ हजार ५२५ स्वयंसहायता समूह स्थापन आहेत. त्यात २ लाख ०२ हजार ५०२ कुटुंबांचा समावेश होतो.या समुहांचे ९२७ ग्रामसंघ असून ६१ प्रभाग संघ आहेत. ३० कोटी रुपयांचे खेळते भांडवल असून ९०३ कोटी रुपयांचा निधी बॅंकांमार्फत देण्यात आला आहे. या महिला बचत गटांनी सेंद्रीय शेती, शेतकरी उत्पादक कंपन्या, सामाजिक सहाय्यता योजना यांच्याशी संलग्न काम करीत आहेत. ऑनलाईन मार्केटींग मध्येही या महिलांची उत्पादने आली असून आता विमासखी म्हणून या महिला विमा क्षेत्रात येत आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना म्हणाले की, महिला बचत गटांचे काम आणि त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता वाखाणण्यासारखी आहे. आता उत्पादन करुन विक्री करण्यासोबतच बचत गटांना सेवा क्षेत्रात, केटरींग व्यवसाय, घनकचरा व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्याच्या उपाययोजना सुरु आहेत. प्रत्येक कुटुंबात लखपती दिदी तयार करण्यासोबतच आता बचतगटाच्या महिलांनी विविध सामाजिक प्रश्नांवरही सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हणून काम करावे. जिल्ह्यातील घटते लिंग गुणोत्तर प्रमाण, बालविवाह या सारख्या प्रश्नावर सामाजिक भुमिका घेऊन गावपातळीवर काम करावे,असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, महिलांना प्रगती करतांना घरापासून किंवा घरातूनच अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी आपण मोठ्या जिद्दीने आणि कष्टाने त्यावर मात करुन इतकी प्रगती साध्य केली आहे. ही अभिमानाची बाब आहे. आपली ही प्रेरणा आणि जिद्दीची संक्रांतीचे वाण म्हणून वाटावी. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होणे आवश्यक असून त्याद्वारेच समाजाचा आणि देशाची प्रगती होईल. सामाजिक प्रश्नांवर महिलांनी सदिच्छादूत म्हणून काम करावे,असे आवाहनही त्यांनी केले. सूत्रसंचालन प्रशांत जोशी यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या