धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त खुल्या निबंध स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा गौरव – अजित कांबळे

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी -: ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तक दिनानिमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक विषयांवर आपली मते मांडली. श्री समर्थ कन्स्ट्रक्शन बार्शी यांच्या वतीने विजेत्यांना रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक श्री दिवाकर नाना बडगुजर, राहणार चोपडा, जिल्हा जळगाव यांनी मिळवले. त्यांनी “खरंच देशाला बौद्ध धम्माची गरज आहे का?” या विषयावर लिहिलेल्या निबंधासाठी रोख ३००० रुपयांचे पारितोषिक प्राप्त केले. त्यांच्या निबंधामध्ये त्यांनी बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाचे महत्त्व, त्याच्या गरजेबाबतची चर्चा व सामाजिक बदलांसाठी त्याची भूमिका स्पष्ट केली.
द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक कु. सलोनी अर्जुन मेस्त्री, राहणार कोल्हापूर यांनी मिळवले. “क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंचे कार्य आजची स्त्री विसरलीय का?” या विषयावर लिहिलेल्या निबंधासाठी त्यांना रोख २००० रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांच्या निबंधात सावित्रीमाई फुलेंच्या कार्याची महती आणि त्याचा आजच्या स्त्रियांसाठी असलेला आदर्श यावर विचार मांडले आहेत.
तृतीय क्रमांकाचे पारितोषिक सारिका सोमनाथ ढेरे, राहणार कासारवाडी रोड, बार्शी यांनी “२१ व्या शतकातील स्त्री धार्मिक गुलाम आहे का?” या विषयावर लिहिलेल्या निबंधासाठी मिळवले. त्यांनी आपल्या निबंधात आधुनिक स्त्रीच्या धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक बंधनांच्या प्रश्नांची मांडणी केली आहे. त्यांना रोख १००० रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत एकूण मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षक मंडळाने विविध निबंधांचे मूल्यांकन करून विजेत्यांची निवड केली. कार्यक्रमाचे आयोजक अजित कांबळे यांनी सर्व सहभागी स्पर्धक, परीक्षक व उपस्थित पत्रकारांचे मनापासून आभार मानले.