शरद पवारांकडून अदानींची पाठराखण; काय म्हणाले…

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल एनडीटीव्हीशी खास संवाद साधताना उद्योगपती गौतम अदानी यांची पाठराखण केली होती. देशासाठी अदानींचे मोठे योगदान आहे. आज पेट्रोकेमिकल क्षेत्रात अंबानींनी योगदान दिले आहे, देशाला त्याची गरज नाही का? वीज क्षेत्रात अदानी यांनी योगदान दिले आहे. देशाला विजेची गरज नाही का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी चूक केली असेल तर तुम्ही विरोध करा, असे म्हणत त्यांनी विरोधकांचे कान पिळले होते. त्यावर आता अदानींविरोधात रान उठवणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बॅकफूटवर आले आहे.
शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर आज सकाळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, या देशात उद्योग वाढले पाहिजेत, उद्योगपती जगला पाहिजे. त्या काळात टाटा-बिर्ला आणि बजाज अशा अनेक उद्योगपतींनी देशाच्या विकासात मोलाचे योगदान दिले. उद्योगपतींना सोडून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार नाही. अर्थव्यवस्थेला चालना मिळणार नाही ही भूमिका आम्हा विरोधीपक्षांची आहे. पवार साहेबांनी अदानींबाबत वेगळी भूमिका घेतली असली तरी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचे तडे जाणार नाहीत. एलआयसी आणि स्टेट बँकेमधील पैसे हे जनतेचे पैसे आहेत. ते कशा प्रकारे भाजपने आपल्या जवळच्या उद्योगपतींच्या खिशात घातले हे हिंडनबर्गच्या अहवालात पुढे आले आहे. लोकांना काही नवीन माहिती मिळाली. केंद्रातील मोदी सरकार एका उद्योगपतीसाठी संपूर्ण देशाची शक्ती कशी पणाला लावत आहेत हे सुद्धा निष्पन्न झाले आहे.
शरद पवारांची आधीपासून तीच भूमिका आहे, त्यात नवीन काही नाही. या प्रकरणामुळे संसदेचे अधिवेशन चालले नाही. त्यात फक्त गौतमअदानी यांच्या चौकशीचा विषय नव्हता, महागाई होती, बेरोजगारी होती. असे अनेक विषय होते, त्यावरूनच संसद चालली नाही. तेव्हासुद्धा तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र भूमिका घेतली होती, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
जेपीसीने काही साध्य होणार नाही. जेपीसीचा अध्यक्ष भाजपचा असत. त्या समितीत भाजपचे जास्त सदस्य असते. हवा तो अहवाल तयार केला असता. शरद पवारांनी न्यायालयीन चौकशीचा पर्याय दिला आहे. ममता बॅनर्जी असो, तृणमूल काँग्रेस किंवा राष्ट्रवादी अदानींबाबत त्यांची वेगळी भूमिका असू शकते. परंतु त्यामुळे विरोधकांच्या एकजुटीत महाराष्ट्रात किंवा राष्ट्रीय स्तरावर कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावाही राऊत यांनी केला.