पाणीपट्टी व व्याज माफ होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलप्रवरा कालव्‍यांच्‍या कामाबाबतचा आढावा

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

शिर्डी : जलसंपदा विभागाकडून आकारण्‍यात येणारी पाणीपट्टी आणि त्‍यावरील व्‍याज माफ करण्‍याबाबतचा ठराव आज जलसंपदा विभागाच्‍या आढावा बैठकीत लाभार्थी शेतकऱ्यांकडून संमत करण्‍यात आला. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेवून शासन स्‍तरावर निर्णय होण्‍याबाबत प्रयत्‍न करु. अशी ग्‍वाही महसूल, पशुसंवर्धन व दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. जलसंपदा विभागाच्‍या गोदावरी मराठवाडा खोरे विकास महामंडळाच्‍या अंतर्गत येणाऱ्या प्रवरा कालव्‍यांच्‍या कामाबाबतचा आढावा महसूलमंत्री श्री‌ विखे पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या बैठकीत घेण्‍यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश नान्‍नोर, तुकाराम बेंद्रे, मच्छिंद्र थेटे, रामभाऊ भुसाळ, अशोकराव म्‍हसे यांच्‍यासह लाभक्षेत्रातील विविध संस्‍थांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

बैठकीत प्राधान्‍याने जलसंपदा विभागाकडून आकारण्‍यात येणाऱ्या पाणीपट्टी बाबतचा विषय शेतकऱ्यांनी प्राधान्‍याने उपस्थित केला. ही पाणीपट्टी माफ व्‍हावी अशी मागणी बहुतांशी शेतकऱ्यांनी केली. याची दखल घेवून महसूलमंत्री श्री. विखे पाटील म्‍हणाले की, कोव्‍हीड संकटानंतर विविध क्षेत्रांना दिलासा देण्‍याचा निर्णय सरकार घेत आहे. त्‍याप्रमाणेच शेतकऱ्यांची ही पाणीपट्टी कशी माफ होईल. याबाबत आपण शासन स्‍तरावरुन निश्चित प्रयत्‍न करणार असल्‍याचे सांगितले.

प्रवरा कालव्‍यांच्‍या अखत्‍यारीत येणाऱ्या चारींचे कामे आणि त्‍या अवतीभवती असणारे अतिक्रमण काढण्‍याबाबत जलसंपदा विभागाने कडक धोरण घ्‍यावे, मशिनरीचा उपयोग करुन, चा-यांचे गेट मोकळे करण्‍याच्‍या सूचना महसूलमंत्र्यांनी यावेळी दिल्‍या. बहुतांशी शेतकऱ्यांनी आप-आपल्‍या गावातील जलसंपदा विभागाच्‍या अखत्‍यारीत येणाऱ्या प्रश्‍नांबाबत बैठकीत लक्ष वेधले. या सर्व प्रश्‍नांची दखल घेवून विभागाच्‍या अधिकाऱ्यांनी संबधित ठिकाणी जावून पाहाणी करावी, विजेच्‍या उपलब्‍धतेची गांभिर्यता लक्षात घेवून लिफ्ट योजना सौर उर्जेवर कशा कार्यान्वित होतील. याबाबतचे सर्व्‍हेक्षणही तातडीने करण्‍याच्‍या सूचना महसूलमंत्र्यांनी दिल्‍या.

आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी पाणी मागणीच्‍या पध्‍दतीत बदल होण्‍याची गरज व्‍यक्‍त करुन, कालव्‍यात पाणी आल्‍यानंतरच मागणी नोंदविण्‍याची कार्यवाही झाली पाहिजे अशी सूचना केली. कार्यकारी अभियंता गणेश नान्‍नोर यांनी आवर्तनाच्‍या नियोजनाचा आढावा या बैठकीत घेतला. आवर्तनाच्‍या बाबतीत झालेल्‍या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून जून महिन्‍यात सुध्‍दा आवर्तनाचे नियोजन विभागाने केले असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या