सुषमा अंधारेंबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या शिरसाटांवर कारवाईस विलंब का?

B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी शिवसेना प्रवक्त्या (उद्धव ठाकरे गट) सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या टिकेवरून राज्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. या प्रकरणाची थेट राज्य महिला आयोगाकडून दाखल घेण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी मविआतील नेते आक्रमक झाले आहेत.
तसेच याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केलीय. तर राज्य महिला आयोगाकडंही याबाबत अंधारे यांनी तक्रार केली आहे. तर चौकशीला सामोरं जाण्याची तयारी असल्याचं शिरसाट म्हणालेत. त्यामुळं हा वाद पेटण्याची शक्यता असून, शिंदे गटातील नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य वाढत असून, नवीन एका वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान, यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या असून, शिरसाट यांच्यावर कारवाईस विलंब का? असा सवाल उपस्थित केला आहे.
“अनेक महापुरुषांचा वैचारिक वारसा असणारे महाराष्ट्र हे अत्यंत सभ्य, सुसंस्कृत राज्य आहे. हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्या शिवरायांनी परस्त्री ही मातेसमान मानली, त्या शिवरायांच्या महाराष्ट्रात महिलांचा अवमान होतो ही खेदाची बाब आहे. राजकारणात कितीही तीव्र विरोध असला तरीही महिलांबद्दल बोलताना कायमच इथल्या राजकीय धुरीणांनी सुसंस्कृतपणाचा आब राखलेला आहे.
पुढे त्या म्हणाल्या की, छत्रपती संभाजीनगर येथील आमदार संजय शिरसाट यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांच्याबाबत बोलताना उधळलेली मुक्ताफळे ही समस्त महिला वर्गाला अपमानित करणारी आहेत. राजकारण असो किंवा समाजकारण, शीर्षस्थानी काम करणाऱ्या महिलांच्या संदर्भाने जर अशी आक्षेपार्ह आणि अवहेलनात्मक वक्तव्य येत असतील तर अगदी तळागाळापर्यंत काम करणाऱ्या महिलांच्या सुरक्षिततेचे काय हा प्रश्न अधिक दाहक बनतो”.