“ग्लोबल वार्मिंगचा समुद्र ठिकाणी होणारा परिणाम” या पथनाट्यातून सामाजिक वनीकरण विभाग व प्रिझम संस्थेच्या वतीने जनजागृती

B1न्यूज मराठी नेटवर्क
अलिबाग : सामाजिक वनीकरण विभाग, रायगड-अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने “ग्लोबल वार्मिंगचा समुद्र ठिकाणी होणारा परिणाम” या विषयावर अलिबाग समुद्रकिनारी स्थानिकांच्या व पर्यटकांच्या उपस्थितीत पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. प्लास्टिकचा अतिवापर, विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर सूरू असलेली वृक्षतोड, मोठ-मोठ्या कंपन्यामधून सतत होणारे हवेचे प्रदूषण, वाहतुकीच्या साधनाच्या अति वापरातून उत्सर्जित होणारे घातक व विषारी वायू , विरळ होत चाललेला ओझोनचा थर, सतत लागणारे वनवे, नद्यामधील भराव यांसह अनेक कारणामुळे वातावरणातील तापमान वाढत जाऊन ग्लोबल वार्मिंगची समस्या अधिक तीव्र होत आहे. ज्यामुळे अनिश्चित पाऊस, सतत येणारी वादळे, समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने किनारपट्टी लगतचे भूक्षेत्र पाण्याखाली जाण्याची भीती निर्माण झाली असून किनारपट्टी लगतचे जनजीवन, पर्यटन यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
यासाठी वृक्षतोड थांबविली पाहिजे, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन केले पाहिजे, अधिकाधिक ई-वाहनांचा वापर केला पाहिजे, प्लास्टिक ऐवजी कापडी व कागदी पिशव्याचा वापर करायला पाहिजे, असे संदेश व जनप्रबोधन पथनाट्यातून करण्यात आले. या कार्यक्रमास प्रसाद गायकवाड – वनक्षेत्रपाल सामाजिक वनीकरण परिक्षेत्र अलिबाग, वनपाल दिपक सोनावणे, वनरक्षक उदय हटवार, वनरक्षक गौरी कोळेकर, अक्षता पाटील, निलेश शिंदे, सत्कार पाटील उपस्थित होते. या पथनाट्याचे नेतृत्व प्रिझम सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी तपस्वी नंदकुमार गोंधळी यांनी केले तर पथनाट्यात विनोद नाईक, सार्थक गायकवाड, श्रेया पाटील, शितल म्हात्रे, समृद्धी पाटील, पार्थ म्हात्रे, मलिनाथ जामदार, नेहा म्हात्रे, सांची म्हात्रे, धनश्री छडीदार, पायल माळी आदी कलाकार सहभागी झाले होते.