व्यापारक्षम, निर्यातक्षम शेती काळाची गरज, त्यासाठी कृषि महोत्सव उपयुक्त : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

B1न्यूज मराठी नेटवर्क
पाचदिवसीय कृषि महोत्सवाचे उद्घाटन , 9 मार्चपर्यंत सर्वांसाठी निःशुल्क खुला
सोलापूर : व्यापारक्षम, निर्यातक्षम शेती काळाची गरज असून, त्यासाठी शेतीची उत्पादकता वाढवणे गरजेचे आहे. कृषि महोत्सव त्यासाठी मदतीचा ठरेल. या माध्यमातून कृषि विषयक अद्ययावत तंत्रज्ञान, नाविण्यपूर्ण बाबी यांचा प्रचार व प्रसार होईल. अशा प्रदर्शनातून मिळालेल्या माहितीचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी उत्पादकता वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशु संवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले. महाराष्ट्र शासन कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा सोलापूर यांच्या मार्फत आयोजित जिल्हा कृषि महोत्सव सोलापूर २०२३ च्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, संजयमामा शिंदे, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अहमदनगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ, महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, विभागीय कृषि सहसंचालक रफिक नायकवडी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बाळासाहेब शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे, उपविभागीय कृषि अधिकारी जयवंत कवडे, उपसंचालक मोरे आदि मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. कोविड काळात उद्योग, व्यापार, व्यवसाय, रोजगार सर्व बंद असताना केवळ शेतकरी बांधव कार्यरत होते. केवळ त्यांच्या अपार कष्टाने अर्थव्यवस्थेला खऱ्या अर्थाने चालना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषि क्षेत्राचे महत्त्व ओळखून, अर्थसंकल्पात मोठी आर्थिक तरतूद ठेवली आहे. यावरून या क्षेत्राचे महत्त्व आपण लक्षात घेतले पाहिजे. देशात सर्वाधिक स्टार्ट अप कृषि क्षेत्रात निर्माण झाले, असे ते म्हणाले.
नदीतून वाळू उपसणे म्हणजे पाणी उपसणे आहे. हा पर्यावरणाचा ऱ्हास आहे. वाळू उपसा थांबवा, असे आवाहन करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षात जगाला तृणधान्यांचे महत्त्व कळाले. आगामी काळात या उत्पादनांना मोठी मागणी राहणार आहे. त्यामुळे शेती उत्पादनांवर प्रक्रिया, त्यांची साठवणूक व बाजारपेठेची उपलब्धता यासाठी काम करणे गरजेचे आहे. महिला बचत गटाच्या उत्पादनांचे ब्रँडिंग व मार्केटिंगसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे अभिनंदन
दुष्काळी ते सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा अशी सोलापूरची ओळख बदलू पाहात आहे. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्युटने केलेल्या सर्वेक्षणात मानव निर्देशांकामध्ये सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. टीम लिडर चांगला असला कि जिल्हा अग्रेसर होऊ शकतो, याचे उदाहरण जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घालून दिले आहे. त्यांनी विविध विचारधारेच्या लोकांना एकत्र आणून जिल्ह्याचा विकास केला, असे सांगून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शंभरकर यांचे विशेष अभिनंदन केले. आमदार सुभाष देशमुख म्हणाले, 2 वर्षांच्या खंडानंतर कृषि महोत्सव होत आहे. यातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होईल. त्यात शेतकऱ्यांनी मूल्यवर्धन करावे. त्यातून शेती उत्पादनाला चांगला भाव मिळू शकेल. सोलापूर जिल्ह्याची वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने अन्य जिल्ह्यात माहिती व्हावीत, यासाठी अशी प्रदर्शने अन्य जिल्ह्यात आयोजित करावीत, असे ते म्हणाले.
उदघाट्ननंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी कृषि महोत्सवतील विविध स्टॉलना भेट देऊन पाहणी केली व शुभेच्छा दिल्या. तसेच, कृषि महोत्सवाच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल कृषि विभागाच्या अधिकारी – कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
प्रास्ताविकात बाळासाहेब शिंदे यांनी कृषि महोत्सवाचा हेतू विषद केला. मदन मुकणे यांनी आभार मानले. प्रारंभी कलापथकांनी लोककलेच्या माध्यमातून शासनाच्या योजनाची माहिती दिली. यावेळी आत्मा विभाग कर्मचारी संघटना, जिल्हा खत विक्रेता संघटनेच्या वतीने पालकमंत्री श्री. विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कृषि विभाग अधिकारी – कर्मचाऱ्यांच्या वतीने मागण्यांचे निवेदन पालकमंत्री श्री. विखे पाटील यांना सादर करण्यात आले. लक्ष्मी विष्णु मिल मैदान, मरी आई चौक, सोलापूर येथे हा कृषि महोत्सव होत असून तो ९ मार्च २०२३ पर्यंत हा खुला राहणार आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आणि शहरातील नागरिकांनी या कृषि महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.