पीएम किसान सन्मान निधी योजनेतर्गंत प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडावे कृषी संचालक विकास पाटील यांचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क
इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत दिनांक ०१ ते १२ फेब्रुवारी या कालावधीत मोहिम
सोलापूर, :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गंत १३ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले आहे. इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत दिनांक ०१ ते १२ फेब्रुवारी, २०२३ या कालावधीत राज्यात यासाठी मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट कर्मचारी यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. आयपीपीबी मार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थीनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे, कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेर्गंत पात्र शेतकरी कुटुंबास रु. २०००/- प्रती हप्ता या प्रमाणे रु. ६०००/- प्रती वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या १३ व्या हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. केंद्र शासनाने १३ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थीनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे. राज्यात सद्यस्थितीत १४.३२ लाख लाभार्थीची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थीच्या खात्यात १३ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.
पी. एम. किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थीची बँक खाती आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे इंडीया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासात जोडले जाईल. सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबी मध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थीना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही. पात्र लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहनही कृषी संचालक पाटील यांनी केले आहे.