बार्शीच्या शनिवार बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ; चार नागरिकांचे ४५ हजारांचे मोबाईल लंपास
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहरातील आठवड्याच्या शनिवार बाजारात गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी चार नागरिकांचे एकूण ४५ हजार रुपये किमतीचे चार मोबाईल फोन लंपास केल्याची घटना शनिवारी (दि. ११ जुलै) सकाळी घडली. या घटनेमुळे बाजारात आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण शामराव लांडगे (रा. संभाजीनगर, बार्शी) हे शनिवारी सकाळी सुमारे ९ वाजता भाजी खरेदीसाठी बाजारात गेले होते. पत्नीशी मोबाईलवर बोलल्यानंतर त्यांनी मोबाईल पॅंटच्या मागील खिशात ठेवला. काही वेळाने भाजीचे पैसे देण्यासाठी खिशात हात घातला असता २० हजार रुपये किमतीचा मोटोरोला कंपनीचा मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
मोबाईलचा शोध घेत असताना समाधान सुधाकर काळे, श्रीकांत वृजकिशोर गुप्ता आणि शंकर बाबुराव शिंदे यांचेही मोबाईल चोरीला गेल्याचे समोर आले. चौघांनी भाजीमंडई परिसरात शोध घेतला; मात्र मोबाईल मिळून न आल्याने त्यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
चोरीस गेलेल्या मोबाईलमध्ये मोटोरोला, विवो आणि ओप्पो कंपनीच्या मोबाईलचा समावेश असून, त्यांची एकूण किंमत ४५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, शनिवार बाजाराच्या दिवशी भाजीमंडई, मुख्य बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने चोरट्यांकडून वारंवार अशा घटना घडत आहेत. मागील सहा महिन्यांत शहरात महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी, घरफोड्या, दुचाकी चोरी तसेच इतर मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नुकतेच पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक गणेश कुंभार व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांनी शनिवार बाजारासह इतर दिवशीही बाजारपेठ, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागात नियमित गस्त, प्रभावी पोलीस बंदोबस्त व ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. त्यांच्या कामगिरीकडून बार्शीकरांना मोठ्या अपेक्षा आहेत.





