कांदा उत्पादकांना प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान द्या;मा आ. राजाभाऊ राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या बाजारातील घसरलेल्या दरांमुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. उत्पादन खर्च वाढला असताना विक्री दरात सातत्याने होत असलेली घसरण पाहता शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान जाहीर करावे, अशी मागणी आमदार राजाभाऊ राऊत यांनी केली आहे.
यासंदर्भात आ. राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षा कमी असून शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. वाहतूक, मजुरी, खत-औषधे आणि साठवणूक खर्च वाढल्यामुळे शेतकरी अडचणीत आले असल्याचे त्यांनी नमूद केले.
कांदा हा राज्यातील प्रमुख नगदी पीक असून अनेक शेतकऱ्यांचे अर्थकारण त्यावर अवलंबून आहे. दर घसरल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही फटका बसत असल्याचे आ. राऊत यांनी सांगितले. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन प्रति क्विंटल ५०० रुपये अनुदान जाहीर करावे, तसेच खरेदी प्रक्रियाही सुलभ करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.





