बार्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिक व फळ पिकांच्या पंचनाम्यांची मागणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यात २३ व २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बार्शीचे आमदार अॅड. दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये गहू, ज्वारी, हरभरा, करडई या रब्बी पिकांसह द्राक्षे, आंबा, चिंच आदी फळपिकांचे गंभीर नुकसान झाल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. अचानक झालेल्या पावसामुळे व जोरदार वाऱ्यामुळे उभ्या पिकांची पडझड होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात आली आहे.
या संदर्भात आमदार दिलीप सोपल यांनी जिल्हाधिकारी, सोलापूर यांना निवेदन देऊन आपत्ती व्यवस्थापन व महसूल नियमावलीनुसार तात्काळ संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी संयुक्तपणे पाहणी करून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करावेत, असे त्यांनी नमूद केले आहे.
पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शासनाच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत व भरपाई देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. सदर बाब अत्यंत तातडीची व गंभीर असल्याने प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आमदार दिलीप सोपल यांनी नमूद केलेआहे.





