महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर महास्वच्छता अभियान; आमदार -अधिकारी – कर्मचारी रस्त्यावर आणि वेरुळ चकाचक

0

स्वच्छता हीच ईश्वर सेवा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी स्वच्छतेत सातत्य राखणे गरजेचे – आ. प्रशांत बंब

B1न्यूज मराठी नेटवर्क500000

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि समाजसेवी संस्था असे तब्बल २००० लोक झाडू घेऊन वेरुळच्या रस्त्यांवर उतरले आणि वेरुळ चकाचक झाले. श्री क्षेत्र घ्रुष्णेश्वर मंदीर परिसर, येळगंगा नदी, मालोजीराजे भोसले गढी परिसर, अरिहंत चौक. लेणी परिसर तसेच गावातील महत्त्वाची मैदाने आदी परिसरात ही स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

स्वच्छता हीच ईश्वर सेवा असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले तर स्वच्छता ही निरंतर बाब असून त्यात सातत्य राखणे गरजेचे आहे,असे मत आ. प्रशांत बंब यांनी व्यक्त केले.
वेरुळ येथे महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यापार्श्वभुमिवर आज वेरुळ येथे महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. आ. प्रशांत बंब, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड तसेच सर्व शासकीय विभागांचे प्रमुख, विविध समाजसेवी संस्थांचे पथके आदी उपस्थित होते.

वेरुळ गावातील वेरुळ लेणी ते अरिहंत चौक, कैलास हॉटेल ते येळगंगा नदी, येळगंगा नदी ते तलाठी ऑफिस, मालोजीराजे भोसले गढी, तीर्थकुंड ते भोसले चौक, भोसले चौक ते कसाबखेडा रोड आदी परिसरात बाजार तळ, कब्रस्थान, एमटीडीसी पार्कींग, महादेव उद्यान, दर्गा दावल मलिक, भीमनगर परिसर अशा भागात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, स्थानिक गावकरी आदींनी आपले श्रमदान करुन स्वच्छता केली. कचरा संकलनासाठी आणलेल्या वाहनांचे पूजन करुन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी सांगितले की, यात्रोत्सवाच्या पार्श्वभुमिवर स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायती मार्फत दैनंदिन स्वच्छता राबविण्यात येते. गावातील लोकांनी आपल्या परिसराची स्वच्छता राखणे गरजेचे आहे.

आ. प्रशांत बंब म्हणाले की, महाशिवरात्रीनिमित्त वेरुळ येथे देशभरातील भाविक येतात. त्यांना या ठिकाणी स्वच्छता व सुविधा उपलब्ध करणे हे आपले कर्तव्य आहे. स्वच्छता ही निरंतर बाब असून त्यात सातत्य असणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, स्वच्छता हीच खरी ईश्वरसेवा आहे. आपल्या जिल्ह्यात असलेले हे मोठे तीर्थक्षेत्र आहे. येथे येणाऱ्या भाविकांना स्वच्छता व सेवा मिळायला हवी. येथे जर अस्वच्छता असली तर ती बाब आपल्याला भुषणावह नाही. आपण सर्व विभाग व स्वयंसेवी संस्था मिळून २ हजार लोकांचे श्रमदान करुन मंदिर व वेरुळ परिसर स्वच्छ करु या,असे आवाहन त्यांनी केले.

मोहिमेत सहभागी सगळ्यांनी नेमून दिलेला परिसर स्वच्छ केला. सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, सामाजिक वनीकरण, आरोग्य विभाग, जलसंपदा विभाग, महसूल विभाग, परिवहन विभाग, वन विभाग, पुरातत्व विभाग अशा विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले.500000

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या