प्रा. डॉ. राहुल पालके यांची ‘संक्रांतीचा बुद्ध’ या कवितेमधून माणुसकीला हाक
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : भारतीय परंपरा ही प्राचीन असून माणुसकीची नाती जपणारी आहे. सद्यकालीन परिस्थितीत धर्म, जात, भाषा, प्रदेश आदीमुळे निर्माण झाले आहेत. हे भेद मिटवून माणुसकीची हाक प्रा. डॉ.राहुल पालके यांनी संक्रांतीचा बुद्ध या कवितेमधून प्रस्तुत केली आहे. येथील शिवतीर्थ नगरमध्ये आयोजित कार्यक्रमात त्यांनी कवितेचे प्रस्तुतीकरण केले.
मन धाव घेई, मन साव घेई, मन उडत्या पतंगासंग, आकाशी भरारी घेई अशी ते कवितेची सुरुवात करतात.जीवनात सुख-दुःखाचे क्षण येत असतात.सुखाला कवटाळून बसून व दु:खाला बाजूला सारून जीवन जगता येत नाही. या क्षणांना सामोरे जाताना स्वतःला सावरणे गरजेचे असते. पतंगाची दोरी सुटली की पतंग भरकटत जातो. अशावेळी कवितेत त्यांनी बुद्धाची आठवण केली आहे.
वर्षानुवर्षे युध्दाला व संघर्षाना सामोरे जाणाऱ्या माणसांना होणारी हानी लक्षात येते व ते बुद्धाची शिकवण आत्मसात करतात.अशावेळी निसर्गाचे भाव माणसाला कळतात व तो त्याच्याशी एकरूप होतो. यानिमित्ताने बुद्ध हसतो व संघर्ष मिटतो. संक्रांतीच्या उत्साह वाढतो.भारतीय परंपरेत पशु-पक्षी, प्राणी यांचा सहवास महत्त्वाचा मानला आहे.
कवितेत याचे वर्णन करताना डॉ.पालके म्हणतात, डोलणाऱ्या वृक्षवेलींनी रंगबेरंगी पतंगाशी मैत्री केली, काळ्याआईने आकाशाला तिळगुळाची भेट दिली.
संक्रांतीच्या या उत्सवानिमित्त आपापसातले संघर्ष दूर करून मैत्रीचा सलोखा वाढवा हाच संदेश या कार्यक्रमातून स्पष्ट झाला.या निमित्ताने शिवतीर्थ नगर मधील नागरिक व लहान मुले उपस्थित होते.





