आमरण उपोषणाला बार्शीच्या गाडी लोहार समाजाचा पाठिंबा! लोहार समाजाच्या हक्कांसाठी दादासाहेब कळसाईत यांचा लढा

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : टाकळी (टे.), ता. माढा, जि. सोलापूर – लोहार समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी आणि विविध मागण्यांसाठी दादासाहेब कळसाईत यांनी टाकळी (टे.), ता. माढा येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. समाजाच्या मागण्यांकडे प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत असल्याने, कळसाईत यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यांच्या या लढ्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील लोहार समाजाच्या संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. विशेषतः बार्शीच्या गाडी लोहार समाजाने या आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे.
बार्शीच्या गाडी लोहार समाजाच्या प्रतिनिधींचा एक शिष्टमंडळ टाकळी येथे जाऊन दादासाहेब कळसाईत यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी आपल्या समाजाच्या मागण्यांबद्दल चर्चा केली आणि कळसाईत यांच्या उपोषणाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. समाजाच्या मागण्यांकडे प्रशासनाने त्वरित लक्ष दिले नाही, तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनाला बार्शीतील गाडी लोहार समाजाच्या प्रतिनिधींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. यामध्ये राजाभाऊ नवगण, सतीश नवगण, विठ्ठल लोहार, विजय पोपळघट, प्रवीण अंकुश, आनंद कळसाईत, दिलीप पवार, विष्णू नवगण, निलेश नवगण, बापू रणसिंग, रोहित लोहार, सागर रणसिंग, हर्षद लोहार, शिवाजी रणसिंग, ऋषिकेश टिंगरे, कैलास पोपळघट, सुहास कळसाईत, अमोल नवगण, प्रतीक पोपळघट, मनोज नवगण, मनोज थोरात, समर्थ कांबळे आणि असंख्य समाजबांधव उपस्थित होते. समाजाच्या मागण्यांसाठी सर्वांनी एकजूट राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
लोहार समाजाच्या प्रमुख मागण्या:
- लोहार आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून भरघोस निधी उपलब्ध करावा.
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोफखान्यातील सरदार लोहपुरुष भीमाजी लोहार किंवा लहुजी लोहार यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे.
- लहुजी लोहार आणि भीमा लोहार यांचे स्मारक उभारावे.
- लोहार समाजाच्या व्यवसायासाठी आवश्यक साहित्य पंचायत समितीमार्फत मोफत मिळावे.
- लोहार आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालकपदी लोहार समाजातील व्यक्तींनाच संधी द्यावी.
- प्रत्येक जिल्हा नियोजन समितीमध्ये लोहार समाजातील एका सदस्याचा समावेश अनिवार्य करावा.
- लोहार समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना सुरू करावी.
देशांतर्गत शिक्षणासाठी ₹१० लाख व परदेशातील शिक्षणासाठी ₹२० लाखांचे कर्ज कमी व्याजदरात उपलब्ध करावे.
- मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या लोहार समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी अल्प दरात किंवा विनाशुल्क वसतिगृहांची सोय उपलब्ध करून द्यावी.
समाजाच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहणार!
लोहार समाजाच्या मागण्यांसाठी दादासाहेब कळसाईत यांनी घेतलेला हा लढा संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे. प्रशासनाने या मागण्यांची त्वरित दखल घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. समाजाच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या या लढ्यात सर्वांनी एकत्र राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.