जनकल्याण यात्रेद्वारे योजनांचा होणार जागर

0

विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसारासाठी जनकल्याण यात्रेला सुरुवात

B1न्यूज मराठी नेटवर्क

जनकल्याण यात्रा 2025 चा शुभारंभ मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या शुभहस्ते होऊन राज्यभर योजनांचा जागर होणार

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथून या जनकल्याण यात्रेचा निवासी उपजिल्हाधिकारी
मनीषा कुंभार यांच्या हस्ते शुभारंभ

सोलापूर : शासनाच्या विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जनकल्याण यात्रा 2025 चे आयोजन राज्यभर करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम मोबाईल एलईडी व्हॅनमार्फत राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये करण्यात येत आहे. या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते दिंडोरी, नाशिक येथील झाला आहे.
ही यात्रा राज्यभर होत असून आपल्या जिल्ह्यामध्ये आता जनकल्याण यात्रा पोहोचली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात या योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आली. विशेष सहाय्यक विभागाच्या योजनांवर आधारित माहितीपट त्याचबरोबर माहितीपत्रके नागरिकांना वाटण्यात आली.

विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत. लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक असून, सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन लघुपटाच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे.

ही यात्रा एकूण पंधरा दिवस सुरू राहणार असून, सोलापूर जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथून या जनकल्याण यात्रेचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. यावेळी महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर, तहसिलदार निलेश पाटील, तहसिलदार शिल्पा पाटील, लोकमंगल सहकारी बैंकेचे संचालक प्रल्हाद कांबळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी व नागरिक यावेळी उपस्थित होते.

या यात्रे करता एलईडी व्हॅनद्वारे दाखवण्यात येणाऱ्या माहितीपटाची निर्मिती व दिग्दर्शन शंकर बारवे यांनी केले असून सदर माहितीपट मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे राज्यातील विविध गावात व शहरात दाखविण्यात येऊन जनजागृती करण्यात येत आहे. त्याद्वारे लाभार्थ्यांपर्यंत योजनेची माहिती पोहचविण्यात येणार आहे.

या माहितीपटाद्वारे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले, “आपले राज्य सरकार आणि केंद्र सरकार समाजातील गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार या सर्वांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबवत आहे.

या विविध योजना राबवताना संबंधित लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या हातात मिळावी, यासाठी डी.बी.टी. पोर्टलद्वारे त्यांना त्यांची विशेष सहाय्य मदत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. या योजनेतून भ्रष्टाचार, दिरंगाई थांबली आहे.

समाजातील गरजू, निराधार, निराश्रीत आणि वृद्धांच्या कल्याणासाठी राज्य सरकार नेहमीच कटीबद्ध आहे आणि यापुढेही राहील. समाजातील सर्व गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळावी, यासाठी विशेष सहाय्य विभाग कार्यरत असून सदर योजनेचा प्रसार राज्यभर करण्यात येत आहे तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी योजनांचा लाभ घ्यावा.”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या