विशेष सहाय्य योजना जनकल्याण यात्रेचे जिल्ह्यात स्वागत

B1न्यूज मराठी नेटवर्क
यवतमाळ, दि.4 : विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार व प्रसारासाठी जनकल्याण यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचा शुभारंभ विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्याहस्ते झाल्यानंतर यात्रा संपुर्ण राज्यभर फिरून जनजागृती करत आहे. यात्रेचे आज यवतमाळ येथे आगमण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर यात्रा पुढे रवाना झाली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. विशेष सहाय्य योजनांच्या जनजागृतीसाठी मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे ही जनकल्याण यात्रा काढण्यात आली आहे. राज्याचा विशेष सहाय्य विभागाच्यावतीने विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या व्हॅनमार्फत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील गावे व शहरांमध्ये करण्यात येत आहे.
विभागाच्या योजनांमध्ये श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य शासन व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत.
या योजनांच्या लाभार्थ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे लाभाची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्याचे स्वतःचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित तहसील कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन लघुपटाच्या माध्यमातून विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले आहे. ही यात्रा एकूण पंधरा दिवस सुरू राहणार आहे.
शासन समाजातील गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटीबद्ध आहे. केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकार या सर्वांसाठी विशेष अर्थसहाय्य योजना राबवत आहे. या विविध योजना राबवताना संबंधित लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागू नये, त्यांना मिळणारी रक्कम थेट त्यांच्या हातात मिळावी, यासाठी डीबीटी पोर्टलद्वारे त्यांना त्यांची विशेष सहाय्य मदत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते, असा संदेश व्हॅवर व्हिडीओद्वारे विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिला आहे.