प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गरजू गरीब लोकांना मिळणार हक्काचे घर – सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सातारा : जिल्ह्यासाठी 42 हजार घरकुलांचे उद्दिष्टे मिळाले आहे. गरजू व गरीब लोकांना हक्काचे पक्के घर मिळणार आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत महाआवास अभियान सन 2024-25 अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन मध्ये सातारा जिल्ह्यातील 36 हजार 734 लाभार्थ्यांना घरकुलांची मंजुरी पत्रे व 25 हजार 175 लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण करण्याचा राज्यस्तरीय कार्यक्रम बालेवाडी पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.

सातारा जिल्हास्तरावरील कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या स्व.यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. या जिल्हास्तरीय कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले आदी उपस्थित होते

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे जिल्ह्याला घरकुलाचे उद्दिष्ट मोठ्या संख्येने मिळालेले आहे, असे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले, यामुळे प्रतीक्षा यादीतील ही लाभार्थ्यांना घरकुल मिळणार आहे. शासनाने गरजू व गरीब लोकांना हक्काचे घर मिळावे यासाठी विविध पर्याय उपलब्ध केले आहेत. ज्यांच्याकडे जमीन नाही अशांना जमीन खरेदीसाठी अनुदान देत आहे. सामूहिक घरकुल बांधण्यासाठी गायरान जमिनीही देत आहे.

घरकुलाच्या इतर सुविधांसाठी विविध माध्यमातून अनुदान देत आहे. यामध्ये केंद्रशासन 60 टक्के तर राज्य शासनाचा 40% हिस्सा आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा आदिवासी, कातकरी व मागासवर्गीय नागरिकांनीही लाभ घ्यावा असे आवाहनही सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राथमिक स्वरूपात 10 घरकुल लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी पुणे बालेवाडी येथील राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण सभागृहात करण्यात आले.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती. नागराजन म्हणाल्या, प्रधानमंत्री आवास योजनेमुळे गरजू गरीब लोकांना हक्काचे पक्के घर मिळणार आहे. यामुळे संबंधितांनी 31 मार्च 2025 पर्यंत घरकुलाचे कामे पूर्ण करावीत. शासन व प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या