शेतकऱ्यांनी रेशीम शेती करून समृध्द व्हावे – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

गावातील 70 शेतकऱ्यांनी केली नोंदणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
जालना : दि.6 : रेशीम शेती उद्योगाद्वारे शेतकऱ्यांना शाश्वत तसेच अधिक उत्पादन मिळत असून जालना जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी तुती लागवड करून आपला विकास साधावा. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रेशीम शेती करुन समृध्द व्हावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.
रेशीम कोषांना चांगले दर मिळण्यासाठी उपलब्ध करून देणार ड्रायर तसेच रेशीम धागा निर्मितीचे लहान युनिट दि. 5 फेब्रुवारी 2025 रोजी अंबड तालुक्यातील वडीकाळे येथे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत महारेशीम अभियान-25 अंतर्गत शेतकरी मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी पुलकीत सिंह, तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ कृषी अधिकारी एस.डी.पालवे, कृषी पर्यवेक्षक के.पी.कोकाटे, कृषी सहाय्यक जी. बी. उंडे, जिल्हा रेशीम कार्यालयाचे वरीष्ठ क्षेत्र सहाय्यक शरद जगताप, सरपंच श्रीमती शिवनंदा भगवान ढेबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले, पावसाळ्यात रेशीम कोषांना 250 ते 350 रुपये प्रति किलो दर प्राप्त होतो तर नोव्हेंबर पासून पुढील कालावधीत रेशीम कोषांना 500 ते 700 रुपये प्रति किलो असा वाढीव दर मिळतो. शेतकरी नैसर्गिक रित्या रेशीम कोषांची साठवण करु शकत नाही, परंतु रेशीम कोषांना उष्णता देऊन सुकविल्यास दीर्घ काळ साठविता येतात, यामुळे कमी दर असताना शेतकऱ्यांनी आपले कोष ड्राय करून साठवावे व चांगले दर मिळत असताना त्याची विक्री करावी. या करीता शेतकरी गटास जिल्हा प्रशासनाव्दारे हॉट एअर ड्रायर समुहात देण्यात येईल तसेच ज्या शेतकऱ्यांना स्वत: चे कोषांपासुन त्यांचे गावातच रेशीम धागा बनवायचा आहे अशा गटास रेशीम धागा निर्मितीचे लहान मशीन उपलब्ध करून देण्यात येईल. जालना जिल्ह्यात रेशीम उद्योगातील सर्व प्रक्रियांची उभारणी करून हातमागावर रेशीम वस्त्रे तयार करण्याचे प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. सर्व प्रक्रियांची उभारणी जालना जिल्ह्यात झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कोषांना चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे. करीता जालना जिल्ह्यातील प्रमाणात शेतकऱ्यांनी मोठ्या नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
एक एकर तुती लागवडी करीता मनरेगा योजने अंतर्गत अनुदान देण्यात येते तसेच एक एकर तुती लागवडी पासुन वर्षभरात 2.5 ते 3 लाख पर्यंत रेशीम कोषांचे उत्पादन होते. महारेशीम अभियान-25 अंतर्गत नोंदणी करावयाची अंतिम मुदत 9 फेब्रुवारी असुन या करीता शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाशी संपर्क साधुन मोठ्या प्रमाणात नोंदणी करावी, असे आवाहन रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते यांनी केले.
कार्यक्रमामध्ये वडीकाळे येथील 10 वर्षापासुनचे रेशीम उत्पादक शेतकरी गणेश काळे व दादाराव काळे यांनी आपले त्यांना रेशीम शेतीमधुन कसा फायदा झाला याविषयी अनुभव कथन केले. रेशीम शेतीपासुन चांगले उत्पादन घेणारे शेतकरी गणेश काळे, दादाराव काळे, शंकर गाडेकर यांचा तसेच महारेशीम अभियानात चांगले काम करणारे मनरेगाचे कर्मचारी सुनिल काळे, नितेश कनके, राहुल शेळके यांचा जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ यांच्या आवाहनास प्रतिसाद देत वडीकाळे येथील 60 व कुकडगाव येथील 10 अशा एकुण 70 शेतकऱ्यांनी तुती लागवडी करीता नोंदणी केली.