शिक्षक साहित्य संमेलन साहित्यामुळे जीवन प्रेरणा मिळते – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : साहित्य हे जीवन प्रेरणा देण्यासाठी खूप उपयुक्त असते. त्यातून मनावर संस्कार होतात. असे मनावर प्रेरणा करुन शिक्षणाचा संस्कार देणारे साहित्य निर्माण व्हावे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज एमआयटी येथे केले.
दुसरे शिक्षक साहित्य संमेलन एमआयटी महाविद्यालयाच्या मंथन सभागृहात आयोजित करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, संमेलनाध्यक्ष आशा खडतरे-डांगे, मावळते अध्यक्ष डॉ. हबीब भंडारे, जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.) वंदना चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी(माध्य.) आश्विनी लाटकर, शिक्षणाधिकारी (योजना) आशा भुमकर, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था प्राचार्य देशमुख, एमआयटी चे संचालक मुनिश शर्मा आदी उपस्थित होते.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, शिक्षकांसाठी होणारे हे साहित्य संमेलन हे काळाची गरज आहे. शिक्षकांमधील साहित्यिकाला वाव देण्याची गरज आहे. शिक्षक हा समाज घडवणारा व्यक्ती असतो. आपण ज्या क्षेत्रात कार्य करीत आहात त्याचे सोने करावे. समाजाचा साहित्याशी संबंध दूर होत चालला आहे. त्यासाठी वाडमयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. हे संस्कार विद्यार्थी दशेत करण्याची गरज असून ते कार्य केवळ शिक्षकच करु शकतात. कविता, गितांद्वारे हे भाषेचे संस्कार आपण विद्यार्थ्यांवर करुन त्यांच्यामध्ये वाचन प्रेरणा निर्माण करावी. जेणे करुन वाचन संस्कृतीचे संवर्धन होईल. साहित्यामुळे जीवनप्रेरणा निर्माण होते. सकारात्मक बदलाची सर्व प्रेरणा ही साहित्यातून मिळते. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत साहित्य पोहोचू शकते, त्यादृष्टीने अशा साहित्यसंमेलनांची गरज आहे.
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले की, शिक्षकांनी स्वतः मधील कलागुणांचा वापर मुलांना घडविण्यासाठी करावा. त्याद्वारे शिक्षणाची गुणवत्ता वाढवावी. त्यादृष्टीने शिक्षक साहित्य संमेलनाचे महत्त्व अधोरेखित होते. अजूनही यात खूप काम करण्याची गरज असून मुलांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी याचा अधिक वापर शिक्षकांनी करावा. आपल्या जिल्ह्यातून विविध स्पर्धांमध्ये वा शैक्षणिक यश संपादन करुन राष्ट्रीय राज्यस्तरिय पातळीवर गेलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचे अनुभव हे इतर शिक्षकांनी जाणून घ्यावे. जिल्ह्यात शिक्षणाच्या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन विद्यार्थी घडविण्याचे काम सुरु आहे. विशेष म्हणजे त्यात पालकांचाही तितकाच सहभाग आहे,असेही मीना यांनी सांगितले. रमेश ठाकूर यांनी सुत्रसंचालन तर गीता तांदळे यांनी आभार मानले.