शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विविध योजनांचा लाभ दयावा : ॲड.निलेश हेलोंडे पाटील

कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनची आढावा बैठक
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्याची दखल यंत्रणांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाची काय स्थिती होते,यांची आपल्याला जाणीव आहेच. जिल्ह्यात भविष्यात एकही शेतकरी आत्महत्या होणार नाही व शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषीविषयक योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्याचे निर्देश कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड.निलेश हेलोंडे पाटील यांनी केले.
आज ३१ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ॲड. हेलोंडे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंम्बासे, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास,जिल्हा कौशल्य विकास रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुजारी, जिल्हा उपनिबंधक पांडूरंग साठे,जिल्हा मनोविकारतज्ञ डॉ. महेश कानडे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्रीमती आरती वाकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
ॲड.हेलोंडे पाटील पुढे म्हणाले, जिल्ह्यातील पाळीव दुधाळ जनावरांसाठी चारा उपलब्ध होण्यासाठी ई-क्लास जमिनीवर चारा लागवड करावी. त्यामुळे शेतीपूरक असलेल्या दुग्ध व्यवसायाला दुधाचे उत्पादन वाढविण्यास मदत होईल. हा चारा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून द्यावा. शक्यतो चारा लागवड ही पाण्याची उपलब्धता आहे,त्या जमिनीवर करावी.कोणताही शेतकरी हा प्रधानमंत्री पिक विमा योजनेपासून वंचित राहणार नाही,याकडे लक्ष द्यावे. या योजनेचे महत्त्व शेतकऱ्यांना पटवून देऊन त्यांना पिक विमा काढण्यास प्रोत्साहित करावे.त्यामुळे शेती पिकाचे नुकसान झाले तर त्याला नुकसान भरपाई या योजनेतून मिळण्यास मदत होणार असल्याचे ॲड. हेलोंडे म्हणाले.
जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी हे जैविक शेतीकडे वळले पाहिजे, असे सांगून ॲड.हेलोंडे म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांचा बियाणे,खते व कीटकनाशके खरेदीवर होणारा अनाठाई खर्च वाचण्यास मदत होईल.शेतकऱ्यांनी घरचेच बियाणे वापरले तर त्यावर होणारा खर्च टाळता येईल.घरच्या बियाण्यांच्या पुन्हा कसा वापर करता येईल, यासाठी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे.नापीकी व कर्जबाजारीमुळे शेतकरी चिंताग्रस्त होतो,अशावेळी शेतकऱ्यांना मानसिक तणावातून दूर करण्यासाठी आरोग्य विभागाने त्यांच्या मनोविकार तज्ञाकडून त्यांचे समूपदेशन करावे. त्यामुळे तणावातून शेतकऱ्यांची सुटका करण्यास मदत होईल. आरोग्य विभागाने यासाठी प्रेरणा प्रकल्प प्रभावीपणे राबवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे समुपदेशन करावे. असे त्यांनी सांगितले,
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे शेतमालाचे किमान आधारभूत मुख्य फलक दर्शनी भागात लावावे असे सांगून ॲड. हेलोंडे म्हणाले, त्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकाचे दर माहीत होण्यास मदत होईल. शेतमाल तारण योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना व्हावी व या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये त्यांचे फलक लावावे.शेतकऱ्यांच्या मुलांची व्यवसायविषयक कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात यावे.प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योगाबाबतची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांना झाली तर शेतीतून उत्पादित मालावर प्रक्रिया करून त्यांना शेतीपूरक चांगला व्यवसाय करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होईल असे ॲड.हेलोंडे यावेळी म्हणाले.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात शेतकऱ्यांचे शेती प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे असे सांगून ॲड.हेलोंडे म्हणाले,त्यासाठी जागा व आवश्यक सुविधा एमआयडीसीमध्ये शेतकऱ्यांना शासनाने उपलब्ध करून दयाव्यात.शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी ही शिक्षण विभागाची आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देतांना त्यांना खेळण्यासाठी पुरेसे मैदान असले पाहिजे. कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती प्रभावीपणे गावपातळीवर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. शेतकऱ्यांना वेळेत खरीप व रब्बी पीक कर्ज मिळाले पाहिजे. वन्यप्राण्यांपासून शेतीचे नुकसान होणार नाही,यासाठी वनविभागाने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.शेतकरी कुटुंबांना अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत धान्य पुरवठा वेळेत झाला पाहिजे.असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. ओंबासे म्हणाले, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोफत पुरेशा प्रमाणात चारा उपलब्ध व्हावा याचे नियोजन करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये एका जमिनीवर चारा लागवड करण्याचे नियोजन संबंधित विभागाने करावे.व्यापक प्रमाणात चारा जिल्ह्यातील पशुपालकांना उपलब्ध व्हावा यासाठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांचा समावेश असलेली चारा लागवड समिती गठीत करण्यात येईल.असे त्यांनी सांगितले.
या आढावा बैठकीला कृषी उपसंचालक बी.व्हि.वीर,विभागीय वन अधिकारी पी. ए. पोळ, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक के.जी. तांदळे, महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक महेंद्र व्हटकर,सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती निकिता साकळे,उपशिक्षणाधिकारी श्रीमती आर सी मैंदर्गी , शल्यचिकित्सक डॉ.एस.एल.फुलारी यांची उपस्थिती होती.उपस्थित अधिकाऱ्यांनी त्यांच्या विभागाच्या वतीने शेतकरी व त्यांच्या मुलासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती यावेळी दिली.आभार निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांनी मानले.