वैराग पोलीस ठाणे अंतर्गत दाखल खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : मिथुन साळवे, अखिल शेख, जुबेर शेख व हरी केकडे यांचे विरूद्ध सुरेश पवार यांचे फिर्यादीवरून वैराग पोलीस ठाणे येथे भा. द. वि. कलम 302, 379 व 34 या कलमान्वये दिनांक 04 एप्रिल 2022 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर बार्शी येथील मे. जिल्हा व अतिरीक्त सत्र न्यायाधीश यांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
वैराग पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 2 एप्रिल 2022 रोजी दुपारी आरोपींमध्ये चोरीच्या सोन्यावरून चाललेली भांडणे मयत पप्पू उर्फ सचिन याने सोडविले व त्यांचे टोळीचे नाव पोलिसांना सांगून टोळीचा भांडाफोड केला, याचा राग मनात धरून पप्पू यास हरि केकडे याचे सांगणेवरून जुबेर शेख, मिथुन साळवे व अखिल शेख यांनी लाकडी ठोकळ्याने व धारदार हत्याराने मारहाण करत गंभीर जखमी करून हत्या केली आणि फिर्यादीची मोटार सायकल घेऊन पळून गेले, अशी फिर्याद मयताच्या भावाने वैराग पोलिस ठाण्यात दिली होती.
याप्रकरणी सर्व आरोपी हे साधारण तीन वर्षापासून कोल्हापूर येथील कळंबा कारागृहामध्ये होते. सदर प्रकरणी सहा. पोलिस निरीक्षक महारुद्र परजने यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
सदर खुनाच्या दाखल खटल्याची सुनावणी बार्शी येथील मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांच्यासमोर झाली. सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात झालेल्या सुनावणी व अंतिम युक्तिवादानंतर बार्शी येथील मे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश मे. व्ही. के. मांडे यांनी सबळ पुराव्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली. यात आरोपी मिथुन साळवे, अखिल शेख, जुबेर शेख यांचे वतीने ॲड. प्रशांत एडके, ॲड. सुहास कांबळे, ॲड. समाधान सुरवसे, ॲड. आकाश तावडे आणि आरोपी हरि केकडे याचे वतीने ॲड. राजकुमार नरोटे यांनी काम पाहिले.