टेंभुर्णी-लातूर महामार्ग चौपदरीकरणाला मंजुरी; 574 कोटींचा मिळाला निधीखा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर च्या पाठपुराव्यास यश

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : धाराशिव-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील अत्यंत महत्त्वाचा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या टेंभुर्णी-लातूर महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी अखेर 574 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या निर्णयामुळे खासदार ओमप्रकाश भुपालसिंह उर्फ पवन राजेनिंबाळकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश लाभले आहे.
हा महामार्ग टेंभुर्णी, कुडूवाडी, बार्शी, पांगरी, येडशी, तडवळा, ढोकी आणि लातूर येथील मुरुड या महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडतो. विशेषतः बार्शी शहरातून थेट पश्चिम महाराष्ट्राशी दळणवळण सुलभ करणाऱ्या या मार्गाने शेकडो वर्षांपासून प्रलंबित असलेल्या चौपदरीकरणाचा मुद्दा आता मार्गी लागला आहे.
खा. राजेनिंबाळकर यांनी 2019 पासून या प्रकल्पासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांनी लोकसभेत तारांकित प्रश्नांद्वारे, लक्षवेधी सूचनांद्वारे आणि थेट केंद्रीय मंत्र्यांना भेटून या विषयावर वारंवार चर्चा केली. 2021 आणि 2023 मध्ये विविध बैठका, निवासस्थानी भेटी आणि स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठकीद्वारे या प्रश्नावर सातत्यपूर्ण काम केले.
खा. राजेनिंबाळकर यांनी 18 डिसेंबर 2024 रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेतली. या भेटीत टेंभुर्णी-लातूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव सादर करत निधी मंजुरीची मागणी केली. यावर तत्काळ निर्णय घेत 574 कोटी रुपयांची मंजुरी जाहीर करण्यात आली. या चौपदरीकरणामुळे शिक्षणासाठी तसेच व्यापारासाठी लातूर, सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्राशी थेट संपर्क साधला जाणार आहे. महामार्गाचा अपूर्ण विकास आणि दळणवळणातील अडचणी दूर होतील. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांत आनंदाचे वातावरण असून खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी संघर्ष समितीने महत्त्वाची भूमिका बजावली. नागपूर येथे केलेले आमरण उपोषण आणि विविध आंदोलने यामुळे या मुद्द्यावर लक्ष केंद्रित झाले. हा निर्णय संघर्ष समितीच्या अथक प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम मानला जातो. हा महामार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याचा जलद संपर्क साधला जाईल. स्थानिक नागरिक, व्यापारी व विद्यार्थी वर्गाने खा. राजेनिंबाळकर यांचे आभार मानले असून या निर्णयामुळे दळणवळण सुलभ होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.