वारकऱ्यांना सेवा सुविधा पुरविण्यास दक्ष रहा – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

B1न्यूज मराठी नेटवर्क
पंढरपूर : आषाढी वारीसाठी पालख्यांचे आगमन जिल्ह्यात होत आहे. वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी यंत्रणांनी दक्ष राहावे. वारी कालावधीत प्रत्येक विभागाला देण्यात आलेली जबाबदारी त्यांनी समन्वयाने व्यवस्थित पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.
आषाढी वारी व पालखी मार्गावर प्रशासनामार्फत सुरू असलेल्या कामांचा आढावा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला. शासकीय विश्राम गृह येथे झालेल्या या आढावा बैठकीस जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, प्रांताधिकारी गजानन गुरव, सदाशिव पडदुणे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सुनील जिंतूरकर, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक,मुख्यधिकारी अरविंद माळी, गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, वारकरी भाविकांना पालखी तळांवर, मार्गावर शुध्द व मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी निश्चित करण्यात आलेल्या पाण्याच्या स्त्रोतांची व पाण्याची वेळोवेळी तपासणी करण्यात यावी.तसेच भाविकांना पाणी मुबलक उपलब्ध करावे. आरोग्य विभागाने ओआरएस बरोबर पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. गर्दीच्या ठिकाणी तात्काळ. पालखी तळावर देण्यात आलेल्या सुविधांमध्ये पाणी व्यवस्था, आरोग्य सुविधा, आपत्कालिन कक्ष, शौचालय, अग्नीशमन व्यवस्था आदीबाबतचे माहिती फलक लावावेत. नगरपालिकेने यात्रा कालावधीत स्थानिक लोकसंख्या तसेच येणाऱ्या भाविकांची संख्या विचारात घेवून मुबलक प्रमाणात पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी. तसेच शहरातील नगरपालिकेच्या बोअरवेलसह खाजगी बोअरवेलव्दारे पाणीपुरवठा करावा तसेच नदी पात्र, 65 एकर, मंदीर परिसर येथील वेळोवळी स्वच्छता करावी, नदी पात्रात धोक्याच्या ठिकाणी माहिती फलक लावावेत, नदी पात्रात बॅरेकेटींग करण्याबाबत नगरपालिका व जलसंपदा विभागाने समन्वयाने विनाविलंब कार्यवाही करावी. महिला भाविकांसाठी चेजिंग रुमची उपलब्धता करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
यात्रा कालावधीत अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ, प्रसादाची दुकाने यांच्या वेळोवेळी तपासण्या कराव्यात. तसेच मठ व धर्मशाळा येथे मोठ्या प्रमाणात अन्न व फराळाचे पदार्थ बनविण्यात येतात. याबाबत संबधितांना योग्य मार्गदर्शन करावे. तसेच तपासणीसाठी पथके तैनात करावीत अशा सूचनाही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी यावेळी केल्या.