वारकरी व भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दि. १८ जून ते दि.२३ जून २०२३ या कालावधीत सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार असून या कालावधीत जिल्हा प्रशासनाने वारकरी व भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणंद पालखीतळ व फलटण पालखी तळाची पालखी वारीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार जयकुमार गोरे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, पालखी सोहळा प्रमुख आणि विशस्त तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालखी मुक्कामस्थळाच्या पाहणीवेळी विखे पाटील म्हणाले संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात मुख्य पालखीच्या सोबत नोंदणीकृत दिंड्या असाव्यात व त्यानंतर नोंदणी नाहीत अशा इतर दिंड्यांचा समावेश करावा म्हणजे प्रशासनाला सोयी सुविधांचे नियोजन करताना सोयीचे होईल. भाविकांना पालखी सोहळ्याच्या कालावधीत कुठलाही त्रास होणार नाही याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी. पालखी सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली असता सोहळ्याचे नियोजन जवळपास पूर्ण होत आलेले आहे. लोणंद पालखी तळावरील विद्युतवाहक तारांमुळे वारकरी व भाविकांना त्रास होणार नाही यासाठी या विद्युतवाहक तारा पालखीतळापासून दूर उभाराव्यात, अशा सूचनाही विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

लोणंद पालखीतळ येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी पालखी सोहळ्यासाठी केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या