डॉक्टर व इंजिनियर बनण्यासाठी आता बाहेरगावी जाण्याची गरज नाही – डॉ. अमित पडवळ

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : डॉक्टर व इंजिनियर बनण्यासाठी आता बाहेरगावी जाण्याची गरज नाही. कारण अमोल माने यांच्या श्री सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून बाहेरगावी मिळणाऱ्या सर्व शैक्षणिक सुविधा आता आपल्या बार्शी शहरात उपलब्ध झाल्या असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे मत न्युरोसर्जन डॉ. अमित पडवळ यांनी व्यक्त केले. श्री सायन्स अकॅडमीच्या करिअर उत्सव या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणाच्या वेळी ते बोलत होते.
डॉ. अमित पडवळ पुढे म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्याची शैक्षणिक आवड ओळखून त्याला त्याच्या आवडी नुसार शिक्षण घेण्यास प्रोत्साहन द्यावे. असे केले तरच त्याचे भविष्य उज्वल होण्यास मदत होईल. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, डॉ. अब्दुल कलाम यांना त्यांच्या आवडीचे शिक्षण घेण्यास मिळाले म्हणूनच ते त्या स्थानावर पोहचले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांनीही अभ्यास करताना काही नियमांचे पालन करणे महत्वाचे असून, मी सोळा तास अभ्यास केला असे म्हणून अभ्यास होत नसतो. कारण आपला मेंदू सलग 90 ते 120 मिनिटेच कोणतीही गोष्ट ग्रहण करू शकतो. त्यानंतर केलेला अभ्यास हा अभ्यास नसून ते फक्त डोळ्यासमोर पुस्तक धरणे असते. याचबरोबर मोबाईल पासून विद्यार्थी जितका लांब राहील तितका त्याचा अभ्यास जास्त होईल. म्हणून मोबाईल शक्य तितका टाळणे अभ्यासासाठी हितकारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले श्री शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. प्रकाश थोरात आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, पालकांनी आपल्या पाल्याला केवळ अभ्यासासाठीच आग्रह न करता त्याला त्याच्या आवडीचे खेळ खेळण्यासही प्रोत्साहन द्यावे. त्याचा मेंदू फ्रेश झाला तरच तो चांगला अभ्यास करू शकेल. कुठलेही करिअर निवडताना आपली बौद्धिक क्षमता लक्षात घेणे आवश्यक असते. त्याचबरोबर कोणतेही शिक्षण घेण्यासाठी बाहेरगावीच जावे लागते असेही काही नसून आपल्या शहरात राहूनही ते यशस्वीरित्या पूर्ण करता येते असे डॉ. प्रकाश थोरात म्हणाले.
यावेळी राजस्थान कोटा येथील मार्गदर्शक म्हणून उपलब्ध असलेले डॉ. रमेशकुमार, इंजिनिअर गौरव सिंह, इंजिनिअर रत्नाकर त्रिपाठी, इंजिनिअर अनुप मिश्रा यांनी उपस्थित पालक व विथ्यार्थ्याना मार्गदर्शन देत, श्री सायन्स अकॅडमीच्या माध्यमातून सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन देण्याचा आम्ही प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला आपल्या सहकार्याची अपेक्षा असेल असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना अमोल माने यांनी केले. सूत्रसंचालन जीवन बोधले यांनी तर आभार सागर धनवटे यांनी मानले. यावेळी श्री कोचिंग क्लासेसच्या संचालिका सौ. अंजली माने बार्शी शहर तालुक्यातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.