कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी शेतकऱ्यांना दिला दिलासा , नुकसानीचे पंचनामे करण्याचे दिले निर्देश

B1न्यूज मराठी नेटवर्क
जालना : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बेमोसमी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी हताश न होता धीर धरावा, असे सांगून अधिकाऱ्यांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्य सरकार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. झालेल्या नुकसानीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेतील, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी जालना जिल्ह्यातील वडीगोद्री ता. अंबड येथील अवकाळी पाऊस व वादळीवारामुळे नुकसान झालेल्या गहू पिकाची पाहणी केली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भीमराव रणदिवे, नायब तहसीलदार धनश्री बालचित, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी यांच्यासह महसूल, ग्रामविकास, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी व शेतकऱ्यांची उपस्थिती होती.