लव्ह जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी एकवटला हिंदू जनसागर, हिंदू गर्जना मोर्चा हिंदू बांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद

B1न्यूज मराठी नेटवर्क
गोहत्या, लव्ह जिहाद अन् धर्मांतर या संविधान विरोधी कृत्यांवर कायदेशीर आळा घालण्याची गरज – आमदार टी. राजासिंह ठाकूर
सोलापूर : गोहत्या, लव्ह जिहाद अन् धर्मांतर या संविधान विरोधी कृत्यांवर आळा घालण्याची गरज आहे. त्यामुळे याबाबत शासनाने त्वरीत कायदा करावा, अशी मागणी तेलंगणा येथील आमदार टी राजासिंह ठाकूर यांनी केली. सकल हिंदू समाजातर्फे रविवारी काढण्यात आलेल्या विराट हिंदू गर्जना मोर्चास आमदार श्री. ठाकूर यांनी संबोधित केले. यावेळी हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती. लव्ह जिहाद, धर्मांतरण विरोधी देशभरात कठोर कायदा करावा, गोहत्या बंदी कायद्याची देशभरात कठोर अंमलबजावणी करावी आणि धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज यांचा बलिदान दिवस फाल्गुन अमावस्या ‘धर्मवीर दिन’ म्हणून जाहीर करावा या मागण्यांसाठी रविवारी सकल हिंदू समाजातर्फे विराट हिंदू जनगर्जना मोर्चा काढण्यात आला. या मोर्चास हजारो हिंदू बांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
छत्रपति श्री शिवाजी महाराज चौकात छत्रपति श्री शिवरायांच्या मूर्तीस पुष्पहार घालून मोर्चास प्रारंभ झाला. मोर्चाच्या अग्रभागी भगवा ध्वज घेतलेली अश्वारूढ हिंदू भगिनी होती. त्यामागे हजारो हिंदू भगिनी आणि त्यांच्या पाठीमागे हजारो हिंदू बांधव घोषणा देत चालत होते. ‘लव्ह नही जिहाद है, सोची समजी साजिश है l, जय भवानी जय शिवराय, हिंदू धर्म की जय, लव जिहाद विरोधी कायदा झालाच पाहिजे, धर्मांतर विरोधी कायदा झालाच पाहिजे, सोलापूरातील गोहत्या थांबलीच पाहिजे, छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपति श्री संभाजी महाराज की जय, भारतमाता की जय, हिंदू धर्म की जय’ अशा घोषणा देण्यात येत होत्या.छत्रपति श्री शिवाजी महाराज चौकातून सुरू झालेला हिंदू गर्जना मोर्चा बाळीवेस, लोकमान्य टिळक चौक, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, सावरकर मैदान, सुभाष चौक, सरस्वती चौकमार्गे चार हुतात्मा पुतळा येथे पोहचला. यावेळी वक्त्यांनी उपस्थित हिंदू समुदायाला संबोधित केले. प्रेरणा मंत्राने सभेची सुरुवात झाली. यावेळी व्यासपीठावर ह. भ. प. रामकृष्ण महाराज वीर, प्रा. नलिनी वायाळ, रंगनाथ बंकापूर, संतोष कुलकर्णी, अंबादास गोरंटला उपस्थित होते. आमदार ठाकूर म्हणाले, सोलापुरातून शेकडो हिंदू मुली गायब झाल्या आहेत. हे रोखण्यासाठी धर्माचे काम आपल्या घरापासून सुरु करा. त्याकरिता दररोज एक तास धर्मासाठी द्या. छत्रपति श्री शिवाजी महाराजांचे मावळे बना, असे आवाहनही आ. ठाकूर यांनी केले. हिंदुराष्ट्र सेनेचे संस्थापक धनंजय देसाई म्हणाले, भारत देश हिंदूंचा होता, आहे आणि भविष्यातही राहणार आहे. छत्रपति संभाजी नगर आणि धाराशिव हे नामांतर नव्हे तर शुद्धीकरण आहे. धर्म नष्ट करणाऱ्याचा प्रतिकार करणे हे प्रत्येक हिंदूचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हिंदूराष्ट्र निर्माण होणे आवश्यक आहे. त्यामुळे केंद्र शासनाने देशाला हिंदूराष्ट्र घोषित करावे, अशी मागणीही धनंजय देसाई यांनी यावेळी केली. छत्रपती श्री शिवाजी महाराज हे हिंदू धर्मरक्षकच होते, असेही देसाई म्हणाले.