जीवनात यशस्वी होण्यासाठी तांत्रिक कौशल्य व जीवनकौशल्य यांचा समन्वय आवश्यक–ब्र. कु. राजीवभाई गुप्ता
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी, दि. २७ फेब्रुवारी : “जीवनात यशस्वी होण्यासाठी केवळ तांत्रिक कौशल्य पुरेसे नसून जीवनकौशल्यही तितकेच आवश्यक आहे. विचारांची दिशा सकारात्मक केली तरच मनोबल वाढते आणि सुखी जीवनाचा मार्ग सापडतो,” असे प्रतिपादन सिनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर ब्र. कु. राजीवभाई गुप्ता (मुंबई ) यांनी केले. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शिवाजी महाविद्यालयाच्या हॉल क्रमांक १४ येथे मंडळाच्या सर्व वरिष्ठ महाविद्यालयांतील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी “मेडिटेशनद्वारे एकाग्रता – सुखी जीवनाचा मंत्र” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार ब्र. कु. विनायकराव पाटील तसेच ब्रह्माकुमारी विद्यालयाच्या बार्शी सेवाकेंद्राच्या संचालिका संगीता दिदी उपस्थित होत्या. प्रास्ताविक मनोगत विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा. डॉ. रामेश्वर कोठावळे यांनी व्यक्त केले.
आपल्या मार्गदर्शनात राजीवभाई यांनी विचारांचे सकारात्मक, नकारात्मक, सामान्य व व्यर्थ असे प्रकार स्पष्ट केले. “जशी विचारधारा, तशी भावना” असे सांगत त्यांनी ‘तैसी थिंकिंग वैसी फिलिंग’ या सूत्रावर भर दिला. राजयोग ही मनातील विचारांची दिशा बदलण्याची कला असून प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक विचार केल्यास आत्मविश्वास व मनोबल वाढते, असे त्यांनी सांगितले.स्वतःवर प्रेम करणे, स्वतःकडून झालेल्या चुका स्वीकारून अपराधबोधातून मुक्त होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. “प्रेम आणि आकर्षण यांत फरक आहे; प्रेम नि:स्वार्थ असते, तर आकर्षणात अपेक्षा असतात. प्रेमात समोरच्याला स्वातंत्र्य दिले जाते,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘मेडिटेशन म्हणजे देहाभिमानापासून अलिप्त होऊन ‘मी शरीर नसून ऊर्जा, शक्तीस्वरूप आत्मा आहे’ याची जाणीव होय. ध्यानामुळे संकल्पांची गती कमी होते व अंतर्मनात शांततेचा अनुभव येतो. भारत ही ध्यानभूमी म्हणून प्रसिद्ध असून राजयोगाच्या नियमित साधनेतून एकाग्रता व आनंदी जीवन साध्य होऊ शकते’, असे प्रतिपादन त्यांनी केले. माजी आमदार विनायकराव पाटील यांनी राजयोगाच्या अधिक माहितीसाठी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रात भेट देण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय समारोप डॉ. बी. वाय. यादव यांनी केले. यावेळी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू शिखरे, शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य दिपक गुंड, वैराग उपसेवाकेंद्राच्या संचालिका मीरा दिदी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त व्यवस्थापक ब्र. कु. विलास मांजरे, ब्र. कु. मोहनभाई बुचडे, संजीवभाई कोकाटे यांच्यासह मंडळाच्या सर्व वरिष्ठ शाखांतील प्राध्यापक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभारप्रदर्शन प्रा. डॉ. दत्तात्रय जमाले यांनी केले.
मंडळातर्फे मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. तर ब्रह्माकुमारी विद्यालयातर्फे ‘ यदि तुम भगवान का ध्यान करोंगे. तो भगवान तुम्हारा रखेगा ‘ हा सुविचार फलक मंडळाचे अध्यक्ष डाॅ. बी. वार यादव यांना भेट देण्यात आला.सूत्रसंचालन प्रा. डॉ. आसावरी फरताडे यांनी केले.





