तुळजापूर येथे ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा दिमाखदार शुभारंभ
आधुनिक तंत्रज्ञान,तज्ज्ञ मार्गदर्शन व ७५ स्टॉल्सच्या माध्यमातून बळीराजाला नवे बळ
B1न्यूज मराठी नेटवर्क
धाराशिव : महाराष्ट्र शासन कृषी विभाग,आत्मा विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६’चा आज तुळजापूर येथे उत्साहात शुभारंभ झाला.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.२४ व २५ फेब्रुवारीदरम्यान सैनिक विद्यालय मैदान,नळदुर्ग रोड,तुळजापूर येथे हा महोत्सव पार पडत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या महामेळाव्यात सहभागी व्हावे,असे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
हवामान बदल,वाढता उत्पादन खर्च आणि बदलती बाजारपेठ या आव्हानांचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.आधुनिक शेती तंत्रज्ञान,पीक व्यवस्थापन,सेंद्रिय शेती,प्रक्रिया उद्योग आणि बाजारपेठेतील संधी याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजकुमार मोरे,टाटा इन्स्टिट्यूटचे संचालक बाळ राक्षसे,उपजिल्हाधिकारी सागर नन्नावरे,तहसीलदार बोलंगे आत्माचे प्रकल्प संचालक मिसाळ,उपविभागीय कृषी अधिकारी महादेव आसलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आबासाहेब देशमुख,तालुका कृषी अधिकारी तुळजापूर यांनी केले.
महोत्सवात एकूण ७५ स्टॉल्स उभारण्यात आले असून त्यात शासकीय,निमशासकीय विभाग, महिला बचत गट तसेच विविध संस्थांचा सहभाग आहे.३० शासकीय दालनांमधून कृषी, महसूल,पशुसंवर्धन,जलसंधारण तसेच महिला व बालकल्याण विभागांच्या योजना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.ड्रोन तंत्रज्ञान,कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कृषी यांत्रिकीकरण यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला आहे. सोयाबीन, हरभरा, ऊस, रेशीम आणि आंबा यांसारख्या पिकांच्या लागवडीपासून प्रक्रिया व निर्यातीपर्यंत तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे. ‘उत्पादक ते ग्राहक’ या संकल्पनेतून थेट विक्री दालनांमुळे शेतकऱ्यांना मध्यस्थांशिवाय बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.
पहिल्या दिवशी आयोजित परिसंवादात एआयद्वारे ऊस व्यवस्थापन ( पांडुरंग आवाड), निर्यातक्षम केळी लागवड ( किरण डोके),रेशीम शेतीतील संधी (डॉ. चंद्रकांत लटपटे) आणि बायोचार निर्मिती ( विनायक पाटील) या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. हजारो शेतकऱ्यांनी विविध प्रदर्शने, स्टॉल्स व नाविन्यपूर्ण अवजारे पाहण्यासाठी गर्दी केली. दरम्यान,कुंभारी येथील शेख यांनी सुमारे ८० किलो वजनाच्या बकऱ्यासह लावलेला स्टॉल विशेष आकर्षण ठरला.
उद्या २५ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता डॉ. श्रीकृष्ण झगडे यांचे आंबा मोहर व्यवस्थापन व डॉ. अरुण गुट्टे यांचे रब्बी पीक व्यवस्थापन या विषयांवर मार्गदर्शन होणार असून दुपारी २ वाजता समारोप समारंभ होणार आहे. एकूणच,जिल्हास्तरीय कृषी महोत्सवामुळे प्रत्येक जिल्ह्यातील शेती अधिक उत्पन्नक्षम,शाश्वत व स्पर्धात्मक होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.





