२० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी लोकनाथ यशवंत
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने नांदेड येथे आयोजित २० व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी,लेखक, अनुवादक लोकनाथ यशवंत(नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे.ही माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्याध्यक्ष प्रा. प्रतिमा परदेशी व स्वागताध्यक्ष राहुल एस एम प्रधान (नांदेड) यांनी दिली. हे संमेलन दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज मैदानावर संपन्न होणार आहे.
विद्रोही कवी लोकनाथ यशवंत हे १९ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलन (छ.संभाजी नगर) अध्यक्ष डॉ.अशोक राणा यांच्याकडून सूत्रे हाती घेतील. विद्रोही सांस्कृतिक चळवळ जीवनाच्या सर्व क्षेत्रात समतेचा पुरस्कार करते. “तुमच्या ग्रंथांमध्ये अखिल मानवाचे हित होईल याचे बीज नाही”असे म्हणत म.जोतिराव फुले यांनी उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या घालमोड्या दादांच्या संमेलनास विरोध केला होता.
तीच मराठी साहित्य संमेलने आता विषमतावादी सांस्कृतिक राजकारणाचे मुखंड बनली आहेत. म्हणूनच विद्रोही चळवळीच्या वतीने १९९९ पासून महाराष्ट्रात मुंबई (धारावी), कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती, सोलापूर, नंदुरबार,वाशी, पुणे, मनमाड, धुळे, नाशिक, परभणी, बुलढाणा, हिंगोली, उदगीर, नाशिक, वर्धा, अमळनेर, छ. संभाजी नगर (औरंगाबाद) इ. ठिकाणी १९ साहित्य संमेलने तसेच १ आंतरराज्य (निपाणी) व १ विद्रोही स्त्री साहित्य संमेलन, पुणे यशस्वीपणे आयोजित करण्यात आली आहेत.
ज्येष्ठ आंबडेकरी साहित्यिक बाबुराव बागुल, आदिवासी कवी वाहरु सोनवणे,परिवर्तनवादी विचारवंत डाॅ. यशवंत मनोहर, शाहीर डॉ. अजिज नदाफ, आत्माराम कनीराम राठोड, कॉ. तारा रेड्डी, तुळसी परब, ज्येष्ठ विचारवंत डॉ.आ.ह. साळुंखे, संजय पवार, जयंत पवार, उर्मिला पवार, डॉ. श्रीराम गुंदेकर, डॉ. प्रतिभा अहिरे, विमल मोरे, डॉ. प्रल्हाद लुलेकर, डॉ. आनंद पाटील, गणेश विसपुते, चंद्रकांत वानखेडे, डॉ. वासुदेव मुलाटे, डॉ. अशोक राणा यांसारख्या सर्जनशील साहित्यिक, समीक्षक, अनुवादक, पत्रकार, इतिहासकार,नाटककार यांनी विद्रोही साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे भूषवली आहेत.
प्रा. प्रतिमा परदेशी यांनी सांगितले की, दलित, पीडित आणि शोषितांच्या वेदनांना मराठी कवितेच्या केंद्रस्थानी आणणाऱ्या कवींच्या परंपरेत लोकनाथ यशवंत अग्रभागी आहेत. सलग पाच दशके ते कविता लिहिताहेत. त्यांच्या कवितेमुळे मराठी कवितेचा सामाजिक व वैचारिक चेहरा अमुलाग्र बदलला. लोकनाथ यशवंत यांच्या कवितेला विवेकनिष्ठ परिवर्तनाची वैश्विक आस आहे. त्यांची कविता परंपरेला विधायक नकार देत क्रांतिकारी सामाजिक व सांस्कृतिक जाणीवेच्या आधारावर मानवतेचा सत्याग्रही ध्येयवाद व्यक्त करते. त्यांच्या कवितेतील उपरोध व आत्मटीका ही शैली सत्तेच्या दमनकारी यंत्रणेविरोधात प्रखर भूमिका मांडणारी आहे.
विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड करण्यात आलेले कवी लोकनाथ यशवंत हे समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचे नाव असून ‘आता होऊन जाऊ द्या !’, ‘आणि शेवटी काय झाले?’, ‘पुन्हा चाल करू या…’, ‘बाकी सर्व ठीक आहे…’, ‘हे तर होणार होते हे’ त्यांचे ५ कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कवितांचे हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये ४ अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या कवितांवर ४ नाट्यरूपांतरे – एकपात्री प्रयोग, एकांकिका, नाट्यप्रयोग झाले आहेत. त्यांच्या शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमी वरील “बैल” या कवितेवर ‘बाईस्कोप’ हा मराठी चित्रपट साकारण्यात आला आहे. लोकनाथ यशवंत यांनी स्वतः ४ अनुवाद मन्सूर एजाज जोश, निदा फाजली यांच्या कविता आणि सहादत हसन मंटो यांच्या लघुकथांचे हिंदीतून मराठीत अनुवाद केले आहेत. तर बाबुराव बागुल यांच्या कवितांचा हिंदी अनुवाद देखील त्यांनी केला आहे. त्यांच्या कविता विविध राज्यातील शिक्षणक्रमात समाविष्ट आहेत.
आजच्या विद्वेषी व अघोषित आणीबाणीच्या कालखंडात संविधानिक लोकशाहीवर क्रूर हल्ला होत असताना सत्य व मानवतेसाठी क्रांतीकारी कविता घेऊन मैदानात उभ्या ठाकलेल्या कवी लोकनाथ यशवंत यांच्या निवडीमुळे विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने आयोजित हे विसावे साहित्य संमेलन ‘फुले शाहू आंबेडकर’ प्रणित समतावादी विचारांना बळ देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विसाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष राहुल प्रधान, संघटक किशोर ढमाले, कोषाध्यक्ष डॉ.अनंत राऊत, डॉ.भारत शिरसाठ, एड.वैशाली डोळस,अनंत भवरे आणि विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य पदाधिकारी संमेलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.




