जिल्ह्याच्या शेती, शिक्षण, औद्योगिक विकासावर भर देणार – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

0

जिल्ह्यात 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेत देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती प्रत्यक्ष मैदानावर येऊन शिक्षण मंत्र्यांचे प्रोत्साहन

B1न्यूज मराठी नेटवर्क

अमरावती,दि. 26 : जिल्ह्याला जागतिक नकाशावर स्थान मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. यासाठी शेती, शिक्षण उद्योग आणि महिला सक्षमीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. यात प्रामुख्याने सिट्रस इस्टेटमधील एआय प्रकल्प आणि आशियातील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर जिल्ह्याच्या प्रगतीला नवी दिशा देतील. शासन शेतकरी, महिला, युवा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवित असून प्रगत तंत्रज्ञानाने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या 77वा वर्धापन दिन पोलीस मुख्यालयाच्या परेड मैदानावर पार पडला. यावेळी त्यांनी जिल्ह्याच्या कृषी, शिक्षण , औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटन क्षेत्रातील प्रगतीचा आलेख मांडला. यावेळी पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले जनार्दन बोथे गुरुजी, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, मनपा आयुक्त सौम्या शर्मा, पोलिस आयुक्त राकेश ओला, जिल्हा पोलिस अधिक्षक विशाल आनंद तसेच इतर विभागातील अधिकारी आदी उपस्थित होते.

मंत्री भुसे म्हणाले, शेतकरी हा देशाचा कणा असून गेल्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत केली आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. प्रामुख्याने संत्रा पिकासाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ आधारित तंत्रज्ञानाचा प्रकल्प राबविला जात आहे. औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी ‘पीएम मित्रा टेक्सटाईल पार्क’ची स्थापना करण्यात आली असून अमरावती विमानतळावरील आशियातील सर्वात मोठे पायलट प्रशिक्षण केंद्र मैलाचा दगड ठरणार आहे. चिखलदरा येथील ‘स्कायवॉक’मुळे पर्यटनात वाढ होणार आहे. तसेच मेळघाटातील नाईट सफारी आणि ‘मधाचे गाव’ ही संकल्पना स्थानिक आदिवासींचे जीवनमान उंचावेल. तसेच सिंधी समाजाच्या नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क दिला आहे.

‘लाडकी बहीण’ लाभार्थींनी पतसंस्था स्थापन करण्याचा अभिनव उपक्रम राबविला आहे.
प्रजासत्ताक दिनी राज्यभरातील 1 लाख शाळांमधील 2 कोटी विद्यार्थ्यांनी ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती सादर केल्या. ज्यामध्ये जिल्ह्यातील 1 हजार 500 विद्यार्थ्यांचा सहभाग घेवून आकर्षक कवायती सादर केल्या. विद्यार्थ्यांमध्ये प्रखर राष्ट्रभक्ती, स्वयंशिस्त आणि शारीरिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्र्यांनी मैदानावर येऊन दाद दिली.

यावेळी त्यांच्यासह सर्वांनी टाळ्यांचा कडकडाटात विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. त्यांनी मुलींसाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण, माजी विद्यार्थी संघ स्थापना, विविध समित्यांचे एकत्रीकरण, कॉपीमुक्त अभियान आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विविध शैक्षणिक उपक्रमांची घोषणा करीत शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा मानस व्यक्त केला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्रम गुरुकुंजचे सचिव जनार्दन बोथे गुरुजी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालाबद्दल भुसे यांनी बोथे गुरुजी यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. समाजसेवेसाठी बोथे गुरुजी यांना जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार हा सर्व अमरावतीकरांसाठी अभिमान आणि गौरवाचा क्षण असल्याचे ते म्हणाले.

राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर विविध पथकांनी परेड संचलन केले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी जिल्हा ‘बालविवाहमुक्त’ करण्याबाबत शपथ देण्यात आली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या