कासारवाडी येथे श्रमसंस्कारातून घडली समाजभिमुख पिढी; बी. पी. सुलाखे कॉलेजच्या विशेष शिबिराचा ऐतिहासिक व प्रेरणादायी समारोप
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज, बार्शी यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे कासारवाडी (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथे आयोजित सात दिवसीय विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप आज अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी व भारावलेल्या वातावरणात पार पडला. या शिबिरात 100 स्वयंसेवक व स्वयंसेविकांनी सहभाग नोंदवून राष्ट्रसेवा व ग्रामीण विकासाचा जिवंत आदर्श निर्माण केला.
‘शाश्वत विकासाच्या दिशेने युवकांची भूमिका : जलसंधारण व्यवस्थापन व पडीक जमीन विकास’ या विषयावर आधारित हे शिबिर दि. 17 ते 23 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडले. या दरम्यान स्वच्छता मोहीम, श्रमदान, जलसंधारण कामे, आरोग्य जनजागृती, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, पर्यावरण संवर्धन व विविध प्रबोधनात्मक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले.
समारोप कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. डॉ. जी. एम. सरवदे (माजी संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. एस. बी. करंडे हे होते. प्रमुख उपस्थितीत कासारवाडी गावच्या सरपंच सौ. अश्विनी मंडलिक, उपसरपंच जितेंद्र गायकवाड व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर बडे हे उपस्थित होते.
शिबिराचा सविस्तर अहवाल प्रा. के. एम. माळी यांनी सादर केला. पाहुण्यांचा परिचय डॉ. बी. डी. लांडे यांनी करून दिला. यावेळी निकाल वाचन कार्यक्रम अधिकारी डॉ. एम. ए. ढगे यांनी केले.
🏆 उत्कृष्ट ग्रुप व उत्कृष्ट स्वयंसेविका या दोन्ही पुरस्कारांचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुणे मा. डॉ. जी. एम. सरवदे यांच्या हस्ते करण्यात आले.
🏅 तर उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्काराचे बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. एस. बी. करंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
यामध्ये —
🏆 उत्कृष्ट ग्रुप (विभागून):
▪️ सिंधुदुर्ग ग्रुप
▪️ हरिहर ग्रुप
🏅 उत्कृष्ट स्वयंसेवक (विभागून):
▪️ श्रीराम तोडकरी
▪️ प्रथमेश आगलावे
🏅 उत्कृष्ट स्वयंसेविका (विभागून):
▪️ निशा पवार
▪️ सृष्टी गुंडगिरी
सर्वच गटांमध्ये अत्यंत चुरशीची, शिस्तबद्ध व प्रेरणादायी स्पर्धा झाली. प्रत्येक गटाने दिलेली कामे नियोजनबद्ध व उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण करून ग्रामविकासाचा आदर्श घडविला.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून राष्ट्रीय सेवा योजनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी व राष्ट्रनिष्ठा निर्माण होते, असे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. बी. करंडे यांनी “विद्यार्थ्यांनी समाजासाठी जगण्याचा संस्कार अंगीकारावा,” असे आवाहन केले. प्रमुख पाहुणे डॉ. जी. एम. सरवदे यांनी स्वयंसेवकांच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमात स्वयंसेवकांनी आपल्या अनुभवांचे मनोगत व्यक्त करून शिबिराने घडवलेला जीवनदृष्टीतील बदल सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शिवानी पवार व प्रेमसाई वाघमोडे यांनी प्रभावीपणे केले तर आभार प्रदर्शन डॉ. एम. ए. ढगे यांनी केले. हे शिबिर केवळ उपक्रम नसून समाज घडवणारी चळवळ ठरली, अशी भावना ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.




