कॉपीमुक्त अभियानाच्या यशस्वीतेसाठीसर्व विभागांची सामुहिक जबाबदारी – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
B1न्यूज मराठी नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.१७ : परीक्षेत कॉपी करणे ही अनैतिक बाब आहे. विद्यार्थी दशेत कॉपीमुक्त अभियान राबविणे हे केवळ परीक्षा पद्धती सुधारणा नसून भविष्यातील नितीमान नागरिक घडविण्याचे अभियान आहे. त्यामुळे हे अभियान यशस्वी करणे ही सर्व संबंधित विभागांची सामुहिक जबाबदारी आहे,असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
संत एकनाथ रंगमंदिरात आज माध्यमिक, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेच्या अनुषंगाने कॉपीमुक्त अभियान राबविण्यासंदर्भात मुख्याध्यापक, शिक्षकांची सभा पार पडली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, विभागीय परीक्षा मंडळाच्या सचिव श्रीमती प्रियाराणी पाटील,सहसचिव दीपक कोकतरे, जिल्हा शिक्षणाधिकारी(प्राथ.) जयश्री चव्हाण, जिल्हा शिक्षणाधिकारी (माध्य.)आश्विनी लाठकर, जिल्हा शिक्षणाधिकारी (योजना) अरुण शिंदे, उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा मेहेत्रे, दीपाली थावरे, गीता तांदळे तसेच गटशिक्षणाधिकारी, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, परीक्षा म्हणजे प्राप्त ज्ञानाची उजळणी असते. त्यासाठी कॉपी सारख्या गैरमार्गाचा वापर ही अनुचित व अनैतिक बाब आहे. विद्यार्थ्यांना यापासून परावृत्त करण्यासाठी आपण त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी सुसंस्कारीत विद्यार्थी घडविणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी दशसुत्रीसारखे उपक्रम शिक्षकांनी राबवावे. जेणेकरुन कॉपीसारख्या अपप्रवृत्तींना विद्यार्थी बळी पडणार नाहीत. कायद्याचा, सुरक्षा यंत्रणेचा वापर करुन कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करता येईल. पण मुळातच संस्कारांनी अशा अपप्रवृत्ती विद्यार्थ्यापासून दुर ठेवण्यावर भर द्यावा,असे आवाहन त्यांनी केले.
श्रीमती लाठकर यांनी आभार मानले.




